अहमदनगर | २४.६ | रयत समाचार
शिर्डी, कोपरगाव, संगमनेर आणि राहाता परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका करत ही कारवाई म्हणजे “सरकारी झुंडशाही” असल्याचा आरोप केला.
Sanjay Raut यांनी म्हटले की, भाऊसाहेब वाघचौरे यांनी पक्षत्याग केल्यानंतर प्रथमच शिर्डी दौरा केला. त्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणीही जाब विचारू नये म्हणून सकाळी दहा वाजल्यापासून शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, संगमनेर शहर, संगमनेर तालुका आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय संबंधित खासदार ज्या मार्गाने प्रवास करत होते, त्या मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवून अनेक रस्ते बंद करण्यात आल्याचेही Sanjay Raut यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून प्रश्न उपस्थित करत, “अहिल्यानगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत का? ही सरकारी दहशत आहे का?” असा सवाल केला.
“उघडपणे फिरण्याची हिम्मत नसेल तर गद्दारी केलीच कशाला?” अशी टीकाही त्यांनी केली. राऊत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना आवाहन करत, शिवसैनिकांना तात्काळ मुक्त करावे आणि अन्याय्य कारवाई थांबवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत पोलिस प्रशासन किंवा संबंधित लोकप्रतिनिधींकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नव्हती.
शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांना रोखण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
शिर्डी, कोपरगाव, संगमनेर व राहाता येथे शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. सरकारी झुंडशाहीचा आरोप करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट सवाल केला. संपूर्ण बातमी वाचा फक्त रयत समाचारवर.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


