नवी दिल्ली | प्रतिनिधी
प्रख्यात हिंदी त्रैमासिक ‘आलोचना’च्या संपादक मंडळाचा विस्तार करण्यात आला असून विद्यमान संपादक मंडळातील अशुतोष कुमार आणि संजिव कुमार यांच्यासोबत आता प्रख्यात विदुषी बलवंत कौर यांचीही संपादक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे ‘आलोचना’च्या संपादकीय कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बलवंत कौर या हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि उर्दू या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या विदुषी म्हणून ओळखल्या जातात. गेल्या सुमारे तीस वर्षांपासून त्या दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊस महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करत आहेत.
आलोचक, अनुवादक आणि संपादक म्हणून त्या दीर्घकाळ सक्रिय असून त्यांनी अनेक उल्लेखनीय साहित्यिक आणि संशोधनात्मक कामे केली आहेत. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘स्मृति और दंश : विभाजन, निरंतरता और तीसरी पीढ़ी’ या पुस्तकाने भारत- विभाजनाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण दस्तावेजी अभ्यास मांडला आहे.
लवकरच भारत- विभाजन या विषयावर त्यांची आणखी काही पुस्तके राजकमल प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार असून या पुस्तकांमधून विभाजनाच्या इतिहासाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास प्रवृत्त करणारे विचार मांडले जाणार आहेत.
दरम्यान, ‘आलोचना’च्या सशक्त आणि ऊर्जावान संपादकीय टीममध्ये बलवंत कौर यांच्या समावेशामुळे नियतकालिकाच्या वैचारिक परंपरेला नवे बळ मिळेल, अशी साहित्यविश्वात अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
