अहमदनगर | ९.३ | रयत समाचार
(Business) ज्ञानकौशल्य ट्रस्ट व कर्मलक्ष्मी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ता.१० मार्च रोजी सीएसआरडी संस्थेच्या ऑडीटोरियममध्ये पहिले ‘संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलन’ उत्साहात आयोजित करण्यात आले.लसंमेलनाच्या उद्घाटन सत्रात साहित्यप्रेमी वाचनसंस्कृती जपणाऱ्या रसिकांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संमेलन निमंत्रण समितीच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी दिली.
(Business) या एकदिवसीय संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. सकाळी ९ वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर संत बहिणाबाई ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात येईल. सकाळी १० वाजता ‘संत जनाबाई विचारमंच’ येथे मुख्य उद्घाटन सोहळा पार पडणार असून, यावेळी साहित्य रसिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
(Business) दुपारी १.३० वाजता ‘संत सोयराबाई कवी मंच’ येथे निमंत्रित कवींचे काव्य संमेलन रंगणार आहे. तर दुपारी ३.३० वाजता ‘फातिमा शेख कथा मंच’ येथे कथाकथनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४.१५ वाजता समारोप सोहळा पार पडून ‘कर्मलक्ष्मी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरीतील संत मुक्ताबाई सभागृहात होणाऱ्या या साहित्य संमेलनात महिला, पुरुष साहित्यप्रेमी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या अध्यक्षा जयश्रीताई मेटे यांनी केले आहे. संमेलनाविषयी अधिक माहिती ज्ञानकौशल्य ट्रस्टच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, निमंत्रण समितीच्या कार्याध्यक्ष व वाचनवेल पुस्तक भिशीच्या संस्थापिका रूपाली सोनवणे यांनी सांगितले की, “साहित्य व्यवहाराचा केंद्रबिंदू वाचन आहे. लेखकाने लिहिलेल्या साहित्याला वाचकांनी प्रतिसाद दिला तरच त्या साहित्याला खरे मूल्य प्राप्त होते. त्यामुळेच या संमेलनात प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य रसिकांचाही गौरव करण्यात येत आहे.”
यंदाच्या ‘साहित्यरसिक २०२६’ सन्मानासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या संजीवनी रमाकांत बर्डे, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या ग्रंथालय सहाय्यक पल्लवी चंद्रकांत कुक्कडवाल, तसेच विद्यार्थिनी व हॉबी क्लबच्या माध्यमातून वाचन चळवळीत कार्य करणाऱ्या सृष्टी सुप्रिया सुरेश मैड यांची निवड करण्यात आली आहे.
वाचनसंस्कृतीचा सन्मान, महिला साहित्यिकांचा उत्सव आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांनी रंगणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
