स्मृतिवार्ता | १.३ | रयत समाचार
(Social) १ मार्च हा दिवस म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एका धगधगत्या विचारवंताची आठवण करून देणारा दिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख संघटक, मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेते, ‘जीवनमार्ग’ या पक्षमुखपत्राचे संस्थापक संपादक आणि दासगाव येथील ‘प्रागतिक माध्यमिक विद्यालय’चे संस्थापक कॉम्रेड आर.बी. मोरे हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एका विचारप्रवाहाचे नाव आहे. दलित आणि कम्युनिस्ट चळवळीचे ते सशक्त दुवा आहे़.
(Social) महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील क्रांतिकारी अध्याय. अस्पृश्यतेच्या अमानुष बेड्या तोडण्यासाठी उभा राहिलेला हा लढा संघटनशक्ती, धैर्य आणि दूरदृष्टी यांची कसोटी पाहणारा होता. या लढ्याच्या पाठीशी उभे राहून त्याची प्रभावी आखणी करणाऱ्यांमध्ये कॉ. मोरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठा ठेवत त्यांनी सामाजिक समतेच्या लढ्याला संघटनात्मक बळ दिले.
(Social) कॉ. मोरे यांची विचारधारा केवळ जातिव्यवस्थेविरोधात मर्यादित नव्हती. त्यांनी जात आणि वर्ग या दोन्ही अन्यायकारक रचनांचा परस्परसंबंध ओळखला. त्यांना ठामपणे वाटत होते की, जातिव्यवस्था आणि आर्थिक शोषण या दोन्हींचा अंत झाल्याशिवाय खरी मुक्ती शक्य नाही. म्हणूनच त्यांनी कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातून वर्गसंघर्षाचा मार्ग स्वीकारला. दलित मुक्ती आणि वर्गसंघर्ष यांचा संगम घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न त्या काळात धाडसी आणि दूरदृष्टीचा होता.
‘जीवनमार्ग’ या मुखपत्राच्या माध्यमातून त्यांनी विचारांचा प्रसार केला. त्यांच्या लेखणीत स्पष्टता, तर्कशुद्धता आणि परिवर्तनाची तळमळ होती. सामाजिक विषमता, शोषण आणि अन्याय यावर त्यांनी सातत्याने प्रहार केला. विचारवंत म्हणून ते जितके प्रभावी होते, तितकेच ते संघटक म्हणूनही सक्षम होते.
शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दासगाव येथे ‘प्रागतिक माध्यमिक विद्यालय’ स्थापून त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
कॉम्रेड आर.बी. मोरे यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, समर्पण आणि वैचारिक निष्ठेची कहाणी. त्यांनी सत्तेच्या सोयीपेक्षा सत्याच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. त्यांचा लढा आजही अपूर्ण आहे, कारण जात आणि वर्गविरोधी समाजरचना उभी करण्याचे स्वप्न अजून साकार व्हायचे आहे.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, त्यांच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन करणे आणि त्या विचारांना आजच्या वास्तवाशी जोडणे हीच खरी कृतज्ञता ठरेल. सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी झगडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कॉ. आर.बी. मोरे यांचे जीवन आजही प्रेरणेचा अखंड झरा आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
