अहिल्यानगर | १३ ऑगस्ट २०२६ | रयत समाचार
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत घरोघरी जाऊन गणना पत्रे भरून घेण्याची कार्यवाही १७ ऑगस्ट २०२६पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना नावे समाविष्ट करणे, वगळणे तसेच मतदार नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक महिन्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आणि उपसचिव अरविंद शेट्ये उपस्थित होते.
२४ ऑगस्टनंतर मतदारांना नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेदरम्यान अर्ज करता येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत दावे, हरकती तसेच एसआयआर प्रक्रियेतील विविध बाबींची तपासणी केली जाणार आहे.

गणना पत्रातील माहिती आणि पूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीमध्ये नाव किंवा वयाबाबत तफावत आढळल्यास संबंधित मतदाराला आवश्यक पुरावे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे.
तसेच २००२च्या मतदार यादीत स्वतःचे, आई-वडील अथवा आजी-आजोबांचे नाव जुळवता न आलेल्या मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. नवीन अर्जांची छाननीही याच कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
दावे, हरकती, कागदपत्रांची तपासणी आणि नवीन अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
१७ ऑगस्ट २०२६ — घरोघरी गणना पत्रे भरण्याची कार्यवाही पूर्ण
२४ ऑगस्ट २०२६ — प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
२४ ऑगस्टनंतर — दावे, हरकती व दुरुस्तीसाठी अर्जाची संधी
२७ ऑक्टोबर २०२६ — अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


