education:कर्मवीरायण चित्रपट पाहणे ही रयतेची जबाबदारी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

अहमदनगर | प्रा.डॉ.कॉ. महेबुब सय्यद

१९ जुलै २०२४ रोजी आजचा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे education साक्षर झाला आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीरायण‘ हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमाची पटकथा अनिल सपकाळ व धनंजय भावलेकर यांची असून धनंजय भावलेकरांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात धो-धो चालायला पाहिजे होता.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चारपाच दिवसांनी मी आणि सचिन मोहन चोभे दौंडला जात असताना गप्पा मारत होतो. गप्पा मारताना हा पिक्चर नगरला आला नाही याबद्दल मी खंत व्यक्त केली तर सचिन म्हणाला की, हा सिनेमा पाहण्यासाठी हडपसरमधील थिएटरमध्ये अवघे आठजण हजर होते. अशी फेसबुक पोस्ट आहे. आम्हाला फार वाईट वाटले. ज्या आण्णांनी अक्षरशः लक्षावधी लोकांना शिकवले त्यांच्यावरील चरित्रपटाबद्दल याच महाराष्ट्रात असे कसे घडू शकते? तेव्हाच पाचवड कॉलेजच्या प्रा.मृणालिनी आहेर यांना धर्मांध झुंडीने दिलेला त्रास, ज्याने संरक्षण करावयाचे त्याच पोलिस अधिकाऱ्याने आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित प्राध्यापिकेवर कारवाई करावी यासाठी संस्थेला दिलेले पत्र, त्या पत्रासमोर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाने मान तुकवून प्रा.आहेर मॅडम यांनी गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून माफी मागावी असा आदेश दिला. त्यासाठी शिक्षा म्हणून संस्थेने त्यांच्या एकाच महिन्यात तीन ठिकाणी केलेल्या बदल्या. या सगळ्यांच्या विरोधात मॅडमनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली. परिणामी हायकोर्टाने झापले. हा सगळा तपशील सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांद्वारे सर्वदूर माहिती झाला आहे. यामुळे मी फारच अस्वस्थ झालो.

सचिन म्हणाला कर्मवीरायणचा शो आपण सगळेजण मिळून नगरमध्ये घेऊया. त्याने, शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, जि. अहमदनगरच्या संचालिका सोनाली देवढे-शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष आणि जिजामाता शास्त्र आणि कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुधाकर शेलार, अहमदनगर जिल्हा मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मेढे, प्रा.डॉ.राजाराम गावडे (बारामती), संतोष आहेर (अहमदनगर) यांनी आर्थिक सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळेमामा यांनी पुढाकार घेतला.

रयत समाचारचे संपादक भैरवनाथ वाकळे, आमचे मित्र आणि ग्रामविकासाचे अभ्यासक डॉ.प्रशांत शिंदे, साप्ताहिक राज्यकर्ताचे संपादक महादेव गवळी, ऊर्जिता सोशल फाऊंडेशनच्या संध्या मेढे, रहेमत सुलतान फाउंडेशनचे युनुसभाई तांबटकर, अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे आसिफखान दुलेखान, शिक्षक नेते आयु. विलास साठे, त्यासोबतच आशा थिएटरचे व्यवस्थापक मयूर मुनोत, इत्यादिंच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट अहमदनगरमध्ये दाखवणे शक्य झाले.

आज आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अशा पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटनेने आणि फुले-शाहू-आंबेडकरांनी जे हक्क आपल्याला मिळवून दिले आहेत ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भौतिक मुक्तीसाठी धर्मवीरांची नव्हे तर कर्मवीरांची गरज आहे, हे लक्षात घेऊन ‘कर्मवीरायण’ चित्रपट पाहणे ही रयतेची जबाबदारी आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
2 Comments
  • महत्वाचं म्हणजे , चित्रपट कसा आहे, का पाहावा, अभिनेता/अभिनेत्री यांनी कोणती भूमिका कशी साकारली हे तर लिहिलंच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading