दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित पोलिस कारवाईबाबत राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून उत्तरदायित्वाची मागणी केली.SubEditor | Dipak Shirasath
SHARE
नवी दिल्ली | २६.७ | रयत समाचार
(Rahul Gandhi Letter) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि पेलेट गनचा वापर कोणी मंजूर केला, असा थेट सवाल त्यांनी पत्रातून केलाय.
(Rahul Gandhi Letter) २५ जुलै रोजी लिहिलेल्या या पत्रात राहुल गांधी यांनी २० जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी अतिरेकी बळाचा वापर केल्याचा आरोप केलाय. विद्यार्थ्यांना न्याय्य व उत्तरदायी शिक्षण व्यवस्था हवी होती; मात्र त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(Rahul Gandhi Letter) पत्रात महिला विद्यार्थिनींवरही पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अनेक विद्यार्थी आणि एका पत्रकारालाही गंभीर दुखापत झाल्याचा उल्लेख आहे. राहुल गांधी यांनी १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोचब याची भेट घेतल्याचे सांगत, पेलेट गनमुळे त्याचा एक डोळा गमावण्याची शक्यता असल्याचा दावा केला.
गृहमंत्र्यांना उद्देशून राहुल गांधी यांनी दोन प्रमुख प्रश्न विचारले आहेत.
विद्यार्थ्यांविरोधात पेलेट गनसह प्राणघातक बळ वापरण्याची मंजुरी आपण दिली होती का? नसल्यास ती कोणी दिली?
साध्या वेशातील लाठीधारी व्यक्ती पोलिस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला अधिकृत परवानगी कोणी दिली?
पत्राच्या शेवटी राहुल गांधी यांनी म्हटले की, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा मूलभूत अधिकार असून आंदोलकांचे संरक्षण करणे आणि संवादातून प्रश्न सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपला जाऊ शकत नाही आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.