अहमदनगर | २४.४ | रयत समाचार
(Social) सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ जालिंदर बोरुडे यांना बौध्द संस्कार संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. नगर-संभाजीनगर येथील चेतना लॉनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला.
(Social) या कार्यक्रमात जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस) गुलाबराव खरात यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(Social यावेळी कार्यकारी अभियंता इंजि. पी.बी. गायसमुद्रे, उपजिल्हाधिकारी भारती सागरे, उपअभियंता अरविंद जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे किरण साळवे, बौध्द संस्कार संघाचे अध्यक्ष तथा आयोजक भाऊसाहेब देठे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुलाबराव खरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यात काम करताना जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा जवळून अनुभव आला आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे समाजसेवा केली आहे. विशेषतः नेत्रशिबिरांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना नवदृष्टी देऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यकारी अभियंता इंजि. पी.बी. गायसमुद्रे यांनीही बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्याने हिमालयाएवढे उंच सामाजिक कार्य उभारले आहे. नोकरी करत असतानाही त्यांनी स्वतःच्या खर्चातून समाजसेवा केली, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे, हे विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी देखील फिनिक्सच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात आयोजक भाऊसाहेब देठे यांनी गेल्या 18 वर्षापासून बौध्द संस्कार संघाच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तब्बल 34 वर्षांपासून सातत्याने नेत्रसेवा कार्य सुरू ठेवले आहे. विविध नेत्रशिबिरांचे आयोजन करून त्यांनी हजारो गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी दिली आहे. याशिवाय मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती करून अनेकांना नेत्रदानासाठी प्रेरित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एम.बी. साळवे, शैलेंद्र खंडागळे, डॉ. संगिता खंडागळे, इंजि. संजू घोडके, प्रतिभा देठे, कल्पना कांबळे, पोपट खंडागळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
