सातारा | २७.९ | रयत समाचार
रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर या शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी ‘कर्मवीर मुष्टीफंडा’तून सहा पोती धान्य गोळा करून शाहू बोर्डिंगमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांला आधार दिला.
‘अल्पातून अधिकतम’ ही कर्मवीर भाऊराव पाटीलांची शिकवण विद्यार्थ्यांनी आज पुन्हा आचरणात आणली. शाळेतील चिमुकल्यांनी रोजच्या जेवणातून एक मूठ धान्य वाचवून जमा केले. याच मुष्टिफंडातून तब्बल सहा पोती धान्य संकलित झाले.
शाहू बोर्डिंगमधील मुलांच्या उपजीविकेसाठी या धान्याचा उपयोग होणार आहे. बालवयातच समाजोपयोगी संस्कारांचे बीज विद्यार्थ्यांत रुजवणारा हा उपक्रम ‘रयत कल्चर’चा खरा चेहरा असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.
लहानग्या विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जाणिवेचा हा उपक्रम पाहून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रुजवलेली ‘मुष्टिफंड’ परंपरा आजही जिवंत असून तिचे प्रतिबिंब नव्या पिढीत दिसत असल्याचा अभिमान व्यक्त होत आहे.




