अहिल्यानगर | दिपक शिरसाठ
Public Issue: वाळकी येथील आठवडे बाजारात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र असून बाजारतळ परिसरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने महिला व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच बाजार परिसरात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचाचे अध्यक्ष सचिन बोठे यांनी या गंभीर प्रश्नावर संताप व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनासाठी दोन घंटागाड्या उपलब्ध असतानाही नियमित कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची वेळ येत आहे.
परिणामी बाजार परिसरासह नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असून, त्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून रुग्ण, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याप्रकरणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून बाजार परिसर स्वच्छ करावा, महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारावीत, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी तसेच नियमित कचरा संकलन सुरू करावे, अशी मागणी सचिन बोठे यांनी केली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचाच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष सचिन बोठे यांनी दिला आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


