मुंबई | २.५ | रयत समाचार
(Fraud) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्पष्टपणे टीका करत परखड सवाल उपस्थित केले आहेत. इतर अनेक महामार्गांना शेतकऱ्यांनी विरोध केला नाही, मग शक्तीपीठ महामार्गालाच विरोध का होत आहे, याचा सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
(Fraud) शेट्टी यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरी-नागपूर, नाशिक-अक्कलकोट, सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड, पालखी, पुणे-बेंगलोर आणि मुंबई-नागपूर अशा कोणत्याही महामार्ग प्रकल्पांना शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही. मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत तीव्र नाराजी आहे.
(Fraud) त्यांनी आरोप केला की, या महामार्गाच्या कामात सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा ‘दरोडा’ टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्या ठिकाणी ५१ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्चात रस्ता तयार करते, त्याच प्रकारचा रस्ता राज्य सरकार ११७ कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेट्टी पुढे म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाला समांतर नवीन शक्तीपीठ महामार्ग उभारण्याची गरज काय? आधीच तोटा सहन करणाऱ्या मार्गावर आणखी एक महामार्ग उभारल्यास त्याचा आर्थिक भार राज्यातील जनतेवर पडणार आहे.
त्यांच्या मते, या महामार्गामुळे पुढील किमान ९० वर्षे टोलवसुलीचा बोजा जनतेवर राहणार आहे. तसेच, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन संपादित केली जाणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
या एक्सप्रेस महामार्गावर दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती असतील आणि फक्त २४ ठिकाणी प्रवेश दिला जाणार असल्याने स्थानिकांना त्याचा फायदा कमी होईल, अशीही टीका त्यांनी केली.
याशिवाय, हा महामार्ग अदानी नावाच्या महादेवाची गडचिरोलीतील बॉक्साईट वाहतुकीसाठी आणि मोठ्या उद्योगसमूहांना फायदा करून देण्यासाठीच आखला जात असल्याचा गंभीर आरोपही शेट्टी यांनी केला. देवांच्या नावाखाली हा प्रकल्प असून प्रत्यक्षात काही उद्योगपतीच्या फायद्यासाठीच हा घाट घातला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
