CulturalPolitics: अहिल्यानगरच्या शशीकला अनिलभैय्या राठोड सक्रीय ? खा.निलेश लंकेंच्या उपोषणास उपस्थित राहून पाठिंबा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
https://epaper.rayatsamachar.com/m/2825/66a1cdc28f427

अहमदनगर | तुषार सोनवणे

काही दिवसांपासून स्थानिक खा. निलेश लंके यांचे पोलीस प्रशासनाच्या विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर DSP office आमरण उपोषण चालू आहे. याठिकाणी आज मुळ शिवसेनेच्या शशिकला अनिलभैय्या राठोड यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. दिवंगत अनिलभैया राठोड यांच्यानंतर सार्वजनिक आंदोलनात सहभागी होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असावी.

खा.निलेश लंकेंच्या आंदोलनस्थळी बोलताना त्यांनी आंदोलन पाहून अनिलभैय्या राठोड यांची आठवण काढली. त्यांनी भैय्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अशाच प्रकारचे आंदोलने साहेब करायचे असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा गंभीर झालेला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, त्याचबरोबर खा. लंके यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घ्यावी, असे शशीकला राठोड म्हणाल्या.

मागील काही दिवसांपूर्वी ‘रयत समाचार’ने ‘शहरात पुन्हा एकदा आमदार ‘राठोड’च ?‘ हे संपादकीय ‘ग्यानबाची मेख’ मधे लिहले होते. त्यामुळे दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांचे नाव व फोटो वापरत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या भावी आमदारांची गोची झाली होती. तसेच सेनेतील आमदारकीच्या तयारीत असणारे उमेदवार संभ्रमात आल्याची शहरात चर्चा होती.

शहराचे राजकारण करत असताना चौंडीत जन्मलेल्या आणि मध्यप्रदेशातील माहेश्वर निवासी देशातील महान सत्ताधीश अहल्याबाई होळकर यांचे नाव अहमदनगरला देण्याचा घाट घातला गेला. त्यातही शहराला द्यायचे कि जिल्ह्याला हा संभ्रम कायम होता. रा.स्व.संघाच्या चाणक्यांनी अहिल्याबाईंच्या नावाने सांस्कृतिक राजकारणाचा खेळ मांडला आहे, हे केंव्हाच उघड झाले होते. आरएसएस, सेना, बिजेपीने या नावासाठी आग्रह धरला. महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादीही या नावाच्या सांस्कृतिक राजकारणाच्या जाळ्यात अडकली. आजही राष्ट्रवादी अहिल्यानगर की अहमदनगर यात अडकून पडली आहे. खुद्द शरद पवारांचीही ही अवस्था शहरातील सभेच्या वेळी निदर्शनास आली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि पंजावाल्या राष्ट्रीय काँग्रेसचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही.

अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या राजकारणात जे सक्रिय आहेत. त्यांनी येत्या विधानसभेला आपल्या पक्षाकडून महिला उमेदवाराला आमदारकीचे तिकीट देवून निवडून आणावे व शहराची आमदार एक महिला सत्ताधिश म्हणून पुढे आणावी, हि रयत समाचारची भुमिका आहे. अहिल्याबाईंच्या नावाचे राजकारण करायचे व गडीमाणसांनाच सत्ताधारी करायचे, ही दुटप्पी व महिलाद्रोही भुमिका आहे. अहिल्याबाईंच्या नावाच्या शहराची आमदारही महिलाच असावी. यासाठी मतदारसंघातील एकही महिलाभगिनी विरोध करणार नाही. यासाठी रयत समाचारच्या वतीने लवकरच फक्त महिलांचे मतदान घेण्यात येईल. मतदारांमधे निम्म्या संख्येने महिला असताना त्यांना आमदारकी का नको? सर्व पक्षांनी यंदा महिला उमेदवारच दिला पाहिजे. हिच अहिल्यानगरची खरी व इमानदारीची भुमीका राहिल.

शहराचे लाडके दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्या अर्धांगिनी शशिकला राठोड सक्रिय झाल्याने अनेक शिवसैनिकांना मनस्वी आनंद झाल्याचे दिसून येत आहे. शहर विधानसभा मतदारसंघात तशी सकारात्मक चर्चा आहे.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading