मुंबई | १७.६ | रयत समाचार
(Social) संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
(Social) यावेळी प्रत्येक गाव व शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानपूर्वक कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात यावे. तसेच त्यांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
(Social) राज्य शासनाकडून एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्या अनुषंगाने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा, सामाजिक व आर्थिक अडचणी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव व्ही.आर. ठाकूर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



