कलासंवाद | ०६ ऑगस्ट | रयत समाचार
(World news) नमस्कार समस्त रसिक मायबाप प्रेक्षकहो,
तुमच्याशी जरा बोलायचंय, तुम्हाला काही सांगायचंय म्हणुन हा पत्रप्रपंच. आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही, आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही रहातील पण छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही.
येणाऱ्या ८ ऑगस्ट २०२५ रोजी आमचा “खालिद का शिवाजी” हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झाली. या अनुषंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय. आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने ४ आक्षेप नोंदवले गेलेत, त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे.
(World news) १) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते आणि त्यांचे ११ अंगरक्षक मुस्लीम समाजाचे होते. – याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की, चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कर्तृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकुण सैन्य किती आणि त्या एकुण सैन्यात कुठल्या जाती- धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य. आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असु शकतो किंवा कमी देखील. मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासिकच आहे. छत्रपती महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलतखान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लीम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते, अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती. जसे अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते त्यामुळे आकडे चुक असतीलही पण माहिती अनैतिहासिक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे.
(World news) २) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिद बांधली – याबाबतही काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की, रायगडावर मशिद होती की नाही. याबाबत आपल्याला कालसापेक्ष विचार करावा लागेल. १९६४ साली भारत सरकारने प्रकाशित केलेल्या कुलाबा गॅझेटीयरमधे पान क्र. ९२८ वरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिच्छेदात मशिदीचा उल्लेख आला आहे. यात संबंधित वास्तुचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले प्रकाशन असलेल्या १९६२ साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णु आवळसकर लिखित ‘रायगडाची जीवनकथा’ या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्र. २२ वर किल्लेरायगडाचा नकाशा दिला आहे. त्यात महादरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारूच्या कोठारा समोर “पीर” लिहून मश्जिदीची आकृती चितारण्यात आली आहे. अर्थात ती मशिद छत्रपती महाराजांनी बांधुन घेतली, याबाबतचा उल्लेख नागपुर विद्यापीठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक प्रा. मा.म. देशमुख लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास, युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा’ भाग- तिसरा या पुस्तकाच्या पान क्र. ५१ वर “शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती” असं स्पष्टपणे लिहीलेलं आहे. या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती मात्र त्या बंदी विरोधात मा. उच्चन्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर मा. उच्चन्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली.
याशिवाय रायगडावर गेल्यावर आपल्या हेही लक्षात आल्याशिवाय रहाणार नाही की रायरेश्वराच्या मंदिराचे स्थापत्य महाराजांनी स्वत: हिंदू-मुस्लीम स्थापत्यशैलीत करून घेतले. यावरून महाराजांना परधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा द्वेष होता असं म्हणता येणार नाही. उलट काफीखानाने लिहिलेल्या समकालीन इतिहासात अशी नोंद सापडते की, शिवाजी महाराजांना युध्दादरम्यान मुस्लीम धर्मग्रंथ सापडले तर महाराज ते ग्रंथ सैन्यातील मुस्लीम सैनिकांस देत असत.
एक महत्वाची गोष्ट आपण रसिक मायबापांना लक्षात घ्यायला हवी की, आम्ही कलाकार मंडळी आहोत, इतिहास संशोधक नाही त्यामुळे इतिहास संशोधकांनी केलेलं इतिहास संशोधनावर आम्ही विश्वास ठेवून संवाद लिहीतो.
३) इतिहासाचं विकृतीकरण केलं– मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक महापुरूषावरही आधारलेला नाही. हा चित्रपट पुर्णत: खालिद नावाच्या एक मुस्लीम मुलाचा छत्रपती शिवाजी महाराज समजुन घेण्याचा प्रवास आहे. जो चित्रपट ऐतिहासिक नाही तो चित्रपट इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. चित्रपटाच्या टीमला छत्रपती शिवाजी महाराज माणुसकी सर्वोपरी मानणारे, उच्च-शुद्र असा भेद नसलेले, युगानुयुगांचा जनकल्याणाचा विचार देणारे, रयतेचे कुळवाडीभुषण राजे होते असा विश्वास आहे. महाराजांच्या याच गुणांना एका गोष्टीनुरूप तुम्हा मायबाप प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे. महाराज कोण्या एका भौगोलिक स्थानापुरते, सामाजिक घटकापुरते मर्यादित आहे, असे आम्ही दाखवले असते तर ते इतिहासाचे विकृतीकरण झाले असते कारण त्याने महाराजांची आकाशाएवढी उंची कमी करण्याचा प्रयत्न झाला, असे म्हणता येईल. आमच्या दृष्टीने महाराज हे केवळ एक व्यक्ती नाही तर विचार आहे जो जगभरातल्या लोकांना आदर्श आहे आणि ते भौगोलिक स्थानापुरते, सामाजिक घटकापुरते मर्यादित नाही असं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केल्याने यात इतिहासाचं विकृतीकरण नाही तर महाराजांची वैश्विक स्विकार्हता दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
४) शिवाजी खालीदचा कसा असेल – “शिवाजी महाराज कोणाचे? ज्याला कळाले त्याचे” असा चित्रपटात दाखवलेला संवाद यासाठी बोलका आहे. महाराज केवळ एका राज्याचे, एका देशाचे किंवा एका खंडाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. जगभरातील प्रत्येकाला महाराज समजुन घेण्याचा आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे. याचमुळे महाराज हिंदू-मुसलमान-इसाई-बौध्द-गोरे-काळे-उंच-बुटके-स्त्री-पुरूष अशा सगळ्यांचे आहे. चित्रपटाची मांडणी करतांना एक मुस्लीम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पध्दतीने विचार करतो या कथाबिजाभोवती हा चित्रपट असल्याने ज्याला ज्याला इतर कशाहीपेक्षा ‘माणुसकी सर्वश्रेष्ठ’ वाटते अशा प्रत्येकाचे ते असतील हा विचार या चित्रपटात देण्यात आला आहे.
आपण रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आहात, चित्रपटातून आम्ही मनोरंजनाबरोबरच एक विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्यामागे कुणी मोठा स्टुडीओ नाही, कुणी मोठी संस्था नाही, तरीही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेऊन आम्ही आमचा चित्रपट आपल्या सेवेत दाखल करीत आहोत. चित्रपटावर मत व्यक्त करणं हा आपला अधिकार आम्ही शिरोधार्य मानतो आणि विनंती करतो की, १२० मिनीटाच्या चित्रपटाविषयी ३ मिनीटाचा ट्रेलर बघुन टीका करू नका. आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्की आवडेल, चित्रपट बघितल्यावरही तो आवडला नाही तर मात्र नक्की टिका करा. आम्हाला विश्वास आहे की आमच्या तंत्रावर, कथामांडणीवर तुमचे आक्षेप असतीलही पण आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाहीत.
याउपरही आपल्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळे केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही या चित्रपटातील वादात आलेले संवाद त्वरीत काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वंदे मातरम्, जय शिवराज.
आपले विनम्र
कैलास वाघमारे,राजकुमार तांगडे (लेखक, कलाकर, संवाद लेखक), राज प्रितम मोरे (दिग्दर्शक), मायकल थेवर (निर्माता)
हे ही वाचा : महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.