पाथर्डी | २१ जून | रयत समाचार
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी (२१ जून) पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात योगदिन (Yoga Day) साजरा करण्यात आला. शेख नईम अहमद बादशहा आणि योगगुरू पंकज गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. या उपक्रमात सर्वांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला.
(Yoga Day) कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विविध योगासनांचा सराव केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब बाजीराव काळे यांनी (Yoga Day) योगाचा इतिहास, त्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने दररोज काही वेळ योगासाठी द्यावा. नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन निरोगी राहते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाची सवय लावल्यास भविष्यात निरोगी व सुदृढ समाज घडण्यास मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा : india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे
योगदिनाच्या इतिहासाविषयी माहिती देताना भारतात गर्भगिरी डोंगररांगेतील असलेले सिध्दयोगी नाथपंथाने तसेच पतंजली आदींनी योगाभ्यासावर काम केल्याचे सांगण्यात आले. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याचे सांगण्यात आले. भारताने मांडलेल्या प्रस्तावाला जगातील मोठ्या संख्येने देशांनी पाठिंबा दिला होता.
त्यानंतर २०१५ पासून दरवर्षी २१ जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जात असून, योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश दिला जातो. वर्षातील सर्वांत मोठा दिवस असलेल्या २१ जूनला विशेष महत्त्व असल्याने हा दिवस योगदिनासाठी निवडण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सविता घुणे, सिमा ठाकर, राजश्री दुशिंग, रविंद्र ज्योतिक, संभाजी झिने, राजेश भापकर, ई.आर. आव्हाड, आनंद साळवे, ए.एस. मुळेमामा आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.






