India news | संघटन संस्कृतीचा दीपस्तंभ हरपला; ग.दि. कुलथे यांना सश्रद्ध निरोप

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

स्मृतिवार्ता

मुंबई | १५ एप्रिल | गुरूदत्त वाकदेकर

(India news) १४ एप्रिल २०२५. सोमवारी रात्री नऊ वाजता एक अत्यंत दुःखद बातमी आली. ग.दि. कुलथे यांचं त्यांच्या नेरुळमधील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. महाराष्ट्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटन क्षेत्रात पाच दशके ज्यांनी आपलं आख्खं आयुष्य झोकून दिलं, असे हे अफाट व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. आज असं वाटतंय… एखादं वटवृक्ष कोसळून गेला आहे.

(India news) ज्यांच्या सावलीत कित्येक संघटना उभ्या राहिल्या, अनेक नेतृत्वं घडली, संघर्षांना दिशा मिळाली, असा हा तेजस्वी दीपस्तंभ हरपला. ग.दि. कुलथे हे फक्त एक संस्थापक नव्हते, ते संघटनसंस्कृतीचे शिल्पकार होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा ही पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्व करत करत, अखेर ‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ’ या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली.

(India news) राज्य शासनाच्या तब्बल ७२ खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणणं हे कठीण काम त्यांनी संयम, संवाद, आणि सातत्याच्या माध्यमातून साध्य केलं. ‘महासंघ’ ही फक्त संघटना नव्हती, ती होती एक विचारधारा, एक चळवळ आणि या चळवळीचे ते प्राण होते.
पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या काळात कुलथेसाहेबांनी संवादात्मक संघटन शैलीचा आदर्श घालून दिला. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणं. ते कठोरही होते, पण नेहमी न्याय्यतेच्या बाजूने उभे राहत.
त्यांनी २० पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणलं, दरवर्षी राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून नेतृत्व विकसित केलं, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहावा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह धरला. त्यांचं संघटन हे मागण्या व आंदोलने यापलीकडे जाऊन धोरण निर्मितीतील सक्रिय सहभाग असं होतं. त्यांनी संघटन क्षेत्राला केवळ आक्रमकता नव्हे तर विवेकशीलता आणि दीर्घदृष्टी दिली.
कर्मचारी वर्गासाठी ते फक्त सल्लागार नव्हते ते मार्गदर्शक होते, प्रेरणास्थान होते. कोण्या नवख्या पदाधिकार्‍याने त्यांच्यासमोर आपली शंका ठेवली, तर ती ऐकून घेताना त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा नव्हे, तर एक आत्मीय भाव असायचे. ते आपुलकीनं समजावून सांगायचे, अनुभवांच्या संदर्भासह.
अनेकजण सांगतात, “कुलथेसाहेबांना एकदा भेटलं, की पुढच्या वाटचालीचं ध्येय स्पष्ट होतं.” हीच त्यांची खासियत होती. आज कित्येक विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, निवृत्त कर्मचारी हे त्यांच्या स्पर्शामुळेच घडलेले आहेत, असं ठामपणे म्हणतात.
ग.दि. कुलथे यांचं जाणं हे संघटन क्षेत्रातील मोठी पोकळी आहे. कुठलाही मोठा निर्णय घेताना, कर्मचारी हिताचा विचार करताना, एक मतभेदांचं वादळ असताना… आता “कुलथेसाहेब काय म्हणाले असते?” हा प्रश्न हमखास आठवणार. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणं सहज शक्य नाही. पण त्यांच्या विचारांची, कामाची आणि मूल्यांची ज्योत प्रत्येक संघटकाच्या मनात तेवत ठेवणं, हीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.
१५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नेरुळ पश्चिम येथील स्मशानभूमीत कुलथेसाहेबांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या घरासमोर सकाळी ९ ते १२.३० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
संघटन चळवळीतील महामेरू, कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ, आणि दृष्टी व दीर्घदृष्टीचा संगम असलेल्या ग.दि. कुलथे यांना संपूर्ण अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या वतीने सश्रद्ध निरोप…
(दिनांक : १५/०४/२०२५ वेळ : ०२:४३)
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading