पणजी | १८ मे | प्रतिनिधी
(Goa news) गिरी ते पर्वरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला सध्या वेग आला. मात्र काल दुपारी सुमारे १ वाजता एक सेगमेंट खांबावर चढवत असताना अचानक खाली कोसळला आणि त्याचा काही भाग तुटला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना ज्यावेळी घडली त्यावेळी वाहतूक सुरूच होती. कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेले कामगार सुरक्षित आहेत. मात्र या घटनेचा स्थानिकांनी मोठा धसका घेतला आहे. ‘कामाचा दर्जा बेताचाच असून दृष्टीआड घाईगडबडीत हे काम चालू असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
(Goa news) दुर्घटना केवळ तांत्रिक चुकीमुळे झाली की अन्य कारणामुळे याबाबत मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र नागरिकांनी कंत्राटदार कंपनीला दोषी ठरवत या कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उड्डाणपुलासाठी सेगमेंट टाकण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू असून आतापर्यंत २१ हून अधिक सेगमेंट यशस्वीरित्या बसविण्यात आले आहेत. मात्र आज दुपारी एक सेगमेंट खांबावर चढवत असताना तो अचानकपणे खाली कोसळल्याची घटना घडली.
(Goa news) ही दुर्घटना ज्यावेळी घडली त्यावेळी वाहतूक पूर्णपणे सुरू होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सेगमेंटजवळून दोन्ही बाजूने सुमारे ७०० मीटर वाहतूक कोंडी होती. गिरी महामार्गावरून पणजीकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप देखील केला परंतु वाहतूक जास्त असल्याने तासभर ठप्प होती.
उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या उड्डाणपुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यासाठी अत्यधिक कमिशन दर आकारण्यात आले आहेत,असा आरोप करत पालेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना एवढ्या हलगर्जीपणाने काम करण्यात आले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे, तत्काळ तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पालेकर यांनी केली आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
