अहमदनगर | २२.२ | रयत समाचार
(Education) येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी-आयएसडब्ल्यूआर (CSRD-ISWR) मध्ये १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संचालक प्रा. सुरेश पठारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ.सुरेश मुगुटमल, डॉ.प्रदिप जारे, डॉ.विजय संसारे, आसावरी झपके, डॉ.जेमोन वर्गीस, ट्विंकल ईश्वरी आदी अध्यापकवृंद, विकास कांबळे, शरद गुंडरस, प्रदिप रत्नपारखी, भिवसेन जगताप, मिना शिसवाल, गिरीश शिरसाठ, किरण गिते कार्यालयीन सहकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Education) स्वराज्य संकल्पनेचे महत्त्व सांगताना डॉ. सुरेश पठारे यांनी सर्वांना स्वजबाबदारी घेऊन सामाजिक मूल्यवर्धनासाठी स्वशासनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवरायांनी सेल्फ गव्हर्नन्सचा (स्वशासन) वापर करून अस्मिता जपली असून, भाषा, जमीन, संस्कृतीचे रक्षण करत कोणत्याही भेदभाव किंवा अत्याचाराला स्थान नसावे यासाठी जनतेला शिक्षित केले, असे ते म्हणाले.
(Education) डॉ. पठारे पुढे म्हणाले, शिवरायांचे राज्य हे सामाजिक न्यायाचे होते. महिला, बालके, शेतकरी व सामान्य माणसांना प्राधान्य देऊन सुशासनाची म्हणजेच स्वराज्याची पायाभरणी केली. सामाजिक एकता, सामंजस्य व एकमेकांचा धार्मिक आदर यावर भर देण्याची गरज असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी ही शिकवण सतत जपावी, असे त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत सांगितले.
डॉ. सुरेश मुगुटमल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, शिवरायांची सामाजिक न्याय व समतेची शिकवण आपण सर्वांनी आचरणात आणली पाहिजे. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून समाजिक कार्य करू. डॉ. प्रदिप जारे यांनी सामाजिक कार्य विद्यार्थी यांनी शिवरायांच्या विचारावर रयतेचा सेवा करावी असे सांगितले.
एमएसडब्ल्यू द्वितिय वर्ष विद्यार्थीनी शिवानी भगवाने हिने शिवरायांचे चरित्र सांगून त्यांच्या महिलाविषय धोरणाबाबत चर्चा केली. स्त्रीयांच्या उन्नतीसाठी आज त्याची प्रकर्षाने गरज असल्याचे अधोरेखित केले. बीजेएमसीचे विद्यार्थी भैरवनाथ वाकळे यांनी शिवरायांचे राज्य व लोकशाही संकल्पना थोडक्यात विषद करून शिवविचारांवर रोज काम करण्याचे आवाहन केले.
शिवाजी महाराजांचे स्वराज्यविचार, प्रशासनकौशल्य, समाजसुधारणा आणि पराक्रम यावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्य, राष्ट्रभक्ती, शौर्य आणि सामाजिक नेतृत्वगुण रुजविण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल. कार्यक्रमाचा समारोप शिवरायांना अभिवादन करून आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प करून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शॅम्युअल वाघमारे यांनी तर आभार किशोर ढगे यांनी मानले.
