राहुरी | १३.३ | रयत समाचार
(Agriculture) वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला न्याय मिळावा या मागणीसाठी वांबोरी येथील शेतकरी गोरक्षनाथ मंजाबापू मोरे यांनी येत्या १९ मार्चपासून वांबोरी येथे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. याबाबत त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले.
(Agriculture) मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, वांबोरी चारीचे पाणी वांबोरीच्या दक्षिणेकडील गर्भागिरी पर्वताच्या बाजूच्या शेतीपर्यंत पोहोचत नाही. हा परिसर अधिकृत लाभक्षेत्रात समाविष्ट असूनही शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळालेला नाही.
(Agriculture) चारीच्या पहिल्या टप्प्यात या भागातील बहुतांश पाझर तलाव, ओढे व नाल्यांमध्ये पाणी सोडण्यात आले नाही. तसेच सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातही हा भाग पाण्यापासून वंचित राहिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या अन्यायग्रस्त भागाला वांबोरी चारीचे पाणी मिळावे, अशी मागणी करत १९ मार्चपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. वांबोरी परिसरातील वंचित भागाला तातडीने पाणी देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार निलेश लंके, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वांबोरी चारीचे पाणी वंचित भागापर्यंत पोहोचवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
