कोल्हापूर | २१ ऑगस्ट | रयत समाचार
पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डेमय व धोकादायक रस्त्यांमुळे वाहनधारकांकडून टोलवसुली करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश नुकताच देण्यात आला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे, वाहनधारकांकडून टोल आकारणी करण्याचा अधिकार तेव्हाच लागू होतो जेव्हा रस्ते सुरळीत, खड्डेमुक्त आणि दर्जेदार स्थितीत उपलब्ध करून दिले जातात.
पुणे–कोल्हापूर व कागल–बेळगाव महामार्गावर हजारो खड्ड्यांमुळे वाहनधारकांना हालअपेष्टा. टोलवसुली थांबविण्यासाठी NHAI ला कायदेशीर नोटीस. आदेशाचे पालन न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल होणार.
“चालक व नागरिकांचा चांगल्या दर्जाच्या रस्त्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे,” असे ॲड. पांडे यांचे स्पष्ट मत आहे.
वाहनधारकांकडून जबरदस्तीने टोल वसुली केली जात असताना रस्ते मात्र धोकादायक स्थितीत असल्याचा गंभीर मुद्दा या प्रकरणातून समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा न्यायालयाचा अवमान मानून कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
