Sports | इंग्लंडचा ऐतिहासिक पाठलाग; पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा धक्का

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

 

लीड्स | २५ जून | गुरुदत्त वाकदेकर

(Sports) कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने इतिहास रचत भारतावर पाच विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. डकेटच्या भेदक शतकासह क्रॉली व रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर ३७१ धावांचे लक्ष्य सहज पार करत इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १–० अशी आघाडी घेतली.

 

(Sports) या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात ४७१ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल ४६५ धावा करत भारताला केवळ ६ धावांची लहानशी आघाडी दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६४ धावांवर तंबूत परतला आणि इंग्लंडपुढे ३७१ धावांचे लक्ष्य उभे राहिले.

 

(Sports) पाचव्या दिवशी इंग्लंडने २१/० पासून सुरुवात केली आणि भारताच्या गोलंदाजांना पहिल्या सत्रात यश मिळू दिले नाही. जॅक क्रॉली (६५) आणि बेन डकेट (१४९) यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी करून विजयाचे मजबूत पायाभरणी केली. दुसऱ्या सत्रात भारताने चार गडी बाद केले, पण रूट (५३) आणि जेमी स्मिथ (४४) यांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अपेक्षित धार दाखवली नाही. पहिल्या डावात पाच बळी घेणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात एकही विकेट मिळवू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर रवींद्र जडेजाने एक विकेट मिळवली. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत होता. शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आले, मात्र त्याच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीलाच पराभवाचा तडाखा बसला. भारताची खालची फळी दोन्ही डावांत अपयशी ठरली आणि गोलंदाजीसुद्धा निर्णायक क्षणी प्रभावहीन ठरली.
या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (२०२५–२७) नव्या चक्रात भारताची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. भारत गुणतक्त्यामध्ये चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लीड्समध्ये विजय मिळवलेल्या इंग्लंडच्या खात्यात १२ गुण असून, १०० टक्के गुण टक्केवारीसह ते अव्वल स्थानी आहेत. बांगलादेश व श्रीलंका अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
आता भारतासमोर तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटीचे आव्हान आहे, जी बर्मिंगहॅम येथे खेळली जाणार आहे. भारत पुनरागमन करू शकेल का? ही लढत निर्णायक ठरणार असून, सर्वांचे लक्ष त्या सामन्यावर लागले आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *