नेवासा | २०.४ | रयत समाचार
(Politics) देवगड देवस्थानचे पूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याविषयी वाचाळवीर विकास लवांडे याने केलेले बेजबाबदार, खालच्या पातळीचे आणि समाजात तेढ निर्माण करणारे विधान हे अत्यंत संतापजनक व निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून लवांडे यांनी केवळ एका महान संतपुरुषाचा अपमान केलेला नाही, तर संपूर्ण समाजाच्या भावना दुखावण्याचे पाप केले आहे, अशी प्रतिक्रिया कै. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अब्दुल हाफिज़ शेख यांनी दिली.
(Politics) शेख पुढे म्हणाले, नेवासा तालुक्यातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी देखील ठिकठिकाणी निषेध नोंदवून सामाजिक ऐक्याची भक्कम परंपरा जपली आहे. आज सर्वधर्म, सर्वजाती आणि सर्वसमाज एकत्र येऊन भास्करगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे. महाराजांविषयी असलेला आदर हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व समाजाच्या हृदयात खोलवर रुजलेला आहे.
(Politics) भास्करगिरी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी कधीही जातीधर्मात फूट पाडणारे किंवा कोणत्याही समाजाला कमी लेखणारे वक्तव्य केलेले नाही. उलट, त्यांनी नेहमीच प्रेम, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दिला आहे. अशा निष्कलंक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर आरोप करणे म्हणजे अज्ञानाचा कळस आहे, असे शेख यांचे स्पष्ट मत आहे.
शेख यांनी सांगितले, विकास लवांडे यांने जाणीवपूर्वक खोटे आरोप करून समाजात विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. हे कृत्य मुळीच खपवून घेतले जाणार नाही. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, ही आमची ठाम आणि आक्रमक मागणी आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आम्ही पत्राद्वारे गृहखात्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) च्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अब्दुल शेख यांनी यावेळी दिला.
आज जर अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष केले, तर उद्या समाजात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. भास्करगिरी महाराजांसारख्या संतपुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही, हे आम्ही स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. अशा थोर आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असेही अब्दुल शेख यांनी म्हटले.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
