(Politics) मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाने ओळखले जाणारे श्रीरामपूर शहर सलोख्यासाठी प्रसिद्ध असून शहरातील शांतता व एकोपा कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
(Politics) रामनवमी यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या काही घटनांच्या अनुषंगाने घार्गे यांनी शहराला भेट देऊन विविध समाजघटकांशी संवाद साधला. सुरुवातीला हिंदू समाजातील नागरिक व कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यानंतर मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.
(Politics) दोन्ही बैठकीत त्यांनी शहरातील शांतता व सलोखा टिकवण्यावर भर दिला. पोलीस प्रशासन सर्व बाबींवर लक्ष ठेवून असून गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीसांनी शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देश दिले.
मुस्लिम समाजाच्या बैठकीत बोलताना त्यांनी शहरातील अलीकडील घटनांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. सर्वांनी परस्पर संवाद वाढवून एकमेकांच्या धर्म व परंपरांचा आदर राखावा, असे त्यांनी सांगितले. दर पंधरा दिवसांनी शहरात भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अहमदभाई जहागीरदार, ॲड. समीन बागवान, पत्रकार सलीमखान पठाण, मुख्तार शाह, महबूब कुरेशी, साजिद मिर्झा, फिरोज शाह यांनी सलोखा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अहमद जहागीरदार यांनी कायद्याचे पालन करण्यावर भर दिला, तर अॅड. समीन बागवान यांनी तरुणांमधील व्यसनाधीनतेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. पत्रकार सलीमखान पठाण यांनी शहरातील सलोख्याचे वातावरण टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, कलीम कुरेशी, शाहिद कुरेशी, शन्नू दारूवाला, मुक्तार मणियार, तौफिक शेख, जोएफ जमादार, अॅड. सलमान पठाण, हाफिज सलीम यांच्यासह समाजाचे कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवार यांनी प्रास्ताविक केले, तर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आभार मानले. यापूर्वी घार्गे यांनी व्यापारी, वकील व डॉक्टरांशीही संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.