अहमदनगर | २२ सप्टेंबर | रयत समाचार
(Politics) प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानाच्या कारभारात ऐतिहासिक बदल घडला आहे. शासनाने विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून, प्रशासक म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानप्रमाणे हे देवस्थान सरकारच्या अख्त्यारीत आणण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आलेला कायदा आजपासून अमलात आला असून, यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला.
(Politics) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाची घोषणा केली होती. शासन व्यवस्थापनाखाली आल्यानंतर देवस्थानातील कारभार अधिक पारदर्शक व भाविकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती सरकारकडून करण्यात येणार आहे.
(Politics) दरम्यान, शिर्डी संस्थानप्रमाणे शासन कारभार हाती घेतल्याने देवस्थानातील कर्मचारी कामगारांचे कायदेशिर हक्क मिळतील, नाशिक वणी देवस्थानप्रमाणे कर्मचारी नियम लागू होतील, धार्मिक कार्यांचा दर्जा उंचावेल, भाविकांसाठी सुविधांचा विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शिर्डीप्रमाणेच भाविकांसाठी निवास, भोजनालय, डिजिटल सेवा आणि विकास प्रकल्प हाती घेतले जातील, अशीही शक्यता आहे.
मात्र, जुन्या विश्वस्त मंडळातील काही सदस्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाविकांच्या देणग्यांवर आणि धार्मिक परंपरांवर शासनाचे नियंत्रण येणे योग्य नाही, असे काही माजी विश्वस्तांनी सांगितले. दुसरीकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून, भाविकांचा पैसा आणि सुविधांचा योग्य उपयोग होणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिशिंगणापूर हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, दर शनिवारी येथे प्रचंड गर्दी उसळते. शासन कारभाराखाली आल्यानंतर येथील विकास प्रकल्पांना नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.