नेवासा | १९.६ | विजय खंडागळे
(LLB CET Result) महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test Cell) मार्फत घेण्यात आलेल्या एमएएच एलएलबी (५ वर्षे) सीईटी-२०२६ परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर झाला. या निकालात नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथील कन्या तथा सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या क्षितिजा संदीप शिंदे हिने पहिल्याच प्रयत्नात ९९.२३ पर्सेंटाईल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
(LLB CET Result) तिच्या या यशामुळे नेवासा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाली असून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
(LLB CET Result) एमएएच एलएलबी (५ वर्षे) सीईटी ही महाराष्ट्रातील नामांकित विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी अत्यंत स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा मानली जाते. दरवर्षी राज्यभरातील हजारो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ९९.२३ पर्सेंटाईल मिळविणे ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
क्षितिजाचे वडील संदीप शिंदे हे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत असून आई विद्या शिंदे या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहेत. आईवडिलांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळविल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
यशाबाबत प्रतिक्रिया देताना क्षितिजाने सांगितले, नियमित अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि स्वतःवरील विश्वास यामुळे हे यश मिळवता आले. पुढे विधी शिक्षण घेऊन न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याची इच्छा आहे.
क्षितिजाच्या या यशाबद्दल सुरेगाव (गंगा) परिसरात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळू शकते, याचा प्रेरणादायी संदेश तिच्या यशातून मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून गुणवंत विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरावर सातत्याने उल्लेखनीय यश मिळवत असून त्यात मुलींची वाढती कामगिरी विशेष लक्षवेधी ठरत आहे. क्षितिजा शिंदेच्या यशामुळे नेवासा तालुक्याच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका उज्ज्वल यशाची नोंद झाली.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



