मुंबई | १९.५ | गुरूदत्त वाकदेकर
(Literature) महाकवी सुधाकर गायधनी यांच्या ‘नेणिवेचा डोह’ (Abyss of Subconsciousness) या चिंतनपर निबंधावर आधारित पाचवे ‘नेणिवेचा डोह’ मराठी साहित्य संमेलन ता.१६ मे २०२६ रोजी मुंबईतील वांद्रे येथील राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या प्रशस्त सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शुभंकरोती साहित्य परिवार आणि राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
(Literature) संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ. सदानंद मोरे हे होते, तर साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले.
(Literature) संमेलनातील विशेष आकर्षण ठरले ते ‘नेणिवेचा डोह’ या निबंधावरील अभिवाचन सत्र. या सत्रात संमेलन संयोजिका सोनाली जगताप आणि डॉ. मनोज वराडे यांनी प्रभावी अभिवाचन सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मंजुषा सावरकर या होत्या.
डॉ. मंजुषा सावरकर यांनी ‘नेणिवेचा डोह’ या निबंधावर अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण चिंतन मांडले. मानवी मन, अवचेतन स्मृती, अंतर्मनातील संघर्ष, आत्मसंवाद आणि अस्तित्वाच्या शोधाचा वेध घेत त्यांनी महाकवी गैधनी यांच्या साहित्यविश्वाचे प्रभावी विश्लेषण केले.
‘नेणिवेचा डोह’ हा केवळ साहित्यिक निबंध नसून मानवी चेतनेच्या अंतरंगात डोकावणारा आत्मशोधाचा प्रवास आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. आधुनिक काळातील विखुरलेल्या मनाला अंतर्मुखतेचा मार्ग दाखवणारे हे लेखन असल्याचे सांगताना त्यांनी गैधनी यांच्या साहित्यशैलीतील आध्यात्मिक गूढता आणि सामाजिक भान यांचा समतोल अधोरेखित केला.
डॉ. सावरकर यांच्या अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी भाषणाला उपस्थित साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. वैचारिक समृद्धी, साहित्यिक चिंतन आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम साहित्यवर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
