चेन्नई | ८.५ | रयत समाचार
(India news) तमिळनाडूच्या राजकारणात मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) तमिळगा वेत्री कळगम (TVK) पक्षाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तमिळनाडू राज्य परिषदेच्या वतीने राज्यपालांना पाठविण्यात आले आहे.
(India news) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते टी. रामचंद्रन यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात, पक्ष सचिव एम. वीरपांडियन यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. पक्षाच्या दोन आमदारांच्या वतीने तमिळगा वेत्री कळगमचे अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी बिनशर्त समर्थन दिल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले.
(India news) ता. २३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शासनाच्या हितासाठी हा पाठिंबा देण्यात येत असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.
तमिळगा वेत्री कळगमला मिळालेला हा पाठिंबा तमिळनाडूतील आगामी सत्तासमीकरणांसाठी निर्णायक मानला जात असून, राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळगम पक्षासाठी हा मोठा राजकीय टप्पा मानला जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
