नवी दिल्ली | २२ फेब्रुवारी | श्रीकांत काकतीकर
(India news) देशाच्या राजधानी दिल्ली येथे आजपासून तीन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. अभिजात मराठी भाषेच्या ऐतिहासिक महोत्सवाचे प्रतिबिंब या ग्रंथ दिंडीत पाहायला मिळाले. देशाच्या राजधानी निघालेली अभूतपूर्व अशी ही ग्रंथदिंडी सर्व दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेत होती.
(India news) सकाळी ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाचे मुख्य आयोजक सहज संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे, साहित्यिक कवी शरद गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
(India news) हरी नामाचा गजर, ढोल ताशांचा निनाद, संत साहित्यावर आधारित भव्य चित्ररथ, मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेले मराठी साहित्य रसिक आणि जय भवानी जय शिवाजी गर्जनाने दुमदुमणारा परिसर असे चित्तवेधक आणि मराठी माणसाला अभिमानास्पद असलेले दृश्य देशाच्या राजधानीच्या ग्रंथ दिंडी मार्गावर पाहायला मिळाले.
या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी झाली आहेत. बेळगाव सीमा भागातूनही अनेक कवी साहित्य त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दिल्लीच्या साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.