जामखेड | ११.६ | रयत समाचार
(Education) तालुक्यातील नान्नजमधील श्री नंदादेवी विद्यालयातील भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व प्रशासकीय कारभाराविरोधात माजी सरपंच संतोष उत्तमराव पवार यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेला थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला. विविध तक्रारी करूनही संस्थेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी १० प्रमुख मागण्या संस्थेसमोर मांडल्या.
(Education) संतोष पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या तीन महिन्यांपासून विद्यालयातील विविध गैरप्रकारांबाबत संस्थेकडे अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही किंवा चौकशी सुरू केली नाही. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
(Education) पवार यांनी शाळेत किमान तीन वर्षे कार्यरत राहतील अशा मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, शिक्षक व मुख्याध्यापकांनी आठवड्यातील किमान तीन दिवस गावात मुक्काम करावा, तसेच मागील तीन वर्षांतील शासकीय अनुदान व खर्चाची चौकशी करून कॅशबुक व बँक खात्यांचे उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या केल्या आहेत.
याशिवाय ज्युनियर कॉलेजमधील भ्रष्टाचाराची चौकशी, वसतिगृह अनुदानातील गैरव्यवहारांची तपासणी, विद्यार्थ्यांकडून घेतलेली कथित अवैध रक्कम परत करणे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्यांचा हस्तक्षेप थांबविणे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती शाळेत प्रदर्शित करणे अशा मागण्यांचाही समावेश आहे.
या सर्व मागण्या मान्य न झाल्यास संस्थेच्या अहिल्यानगर येथील मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संतोष पवार यांनी दिला. या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, शिक्षणाधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही पाठविण्यात आली.
या निवेदनामुळे नान्नज परिसरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून संस्थेची भूमिका काय असणार याकडे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



