पुणे | २४.५ | रयत समाचार
(Culture) राज्य शासनाने १६ मे रोजी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात ‘बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज’ यांचे शिल्प अत्यंत औपचारिक पद्धतीने उभारले. इतिहासातील अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घटना असतानाही शासनाकडून कोणताही भव्य सार्वजनिक उत्सव न झाल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
(Culture) याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि समस्त शिवशंभूप्रेमींच्या वतीने आज उत्साहपूर्ण वातावरणात ‘आनंदोत्सव’ साजरा करण्यात आला. ढोलताशांचा गजर, जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
(Culture) यावेळी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, विद्वत्ता आणि ‘बुधभूषण’ या ग्रंथनिर्मितीच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. तसेच हे शिल्प उभारण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सामाजिक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले, छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते उच्च कोटीचे अभ्यासू, संस्कृत पंडित आणि साहित्यिक होते. त्यांच्या विद्वत्तेचे प्रतीक असलेल्या ‘बुधभूषण’ ग्रंथामुळे मराठी इतिहासाला एक वैचारिक अधिष्ठान मिळाले आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि गौरव होणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवशंभूप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक आणि नागरिक उपस्थित होते. पुण्यातील हा ‘आनंदोत्सव’ छत्रपती संभाजी महाराजांविषयी असलेल्या जनतेच्या अपार श्रद्धा आणि अभिमानाचे प्रतीक ठरला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


