मुंबई | २५.४ | रयत समाचार
(Health) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि मनमुक्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बालकांच्या मानसिक आरोग्याच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मानस प्रकल्प- सुरक्षित बालपण, समृद्ध महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी दिली.
(Health) या अभियानाचा मुख्य उद्देश बालकांमध्ये वाढत्या मानसिक तणाव, नैराश्य आणि भावनिक अडचणी ओळखून त्यावर योग्य वेळी उपाययोजना करणे हा आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे मुलांवर वाढणारा मानसिक ताण लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
(Health) ‘मानस प्रकल्प’ अंतर्गत शाळा, पालक आणि शिक्षक यांना मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच समुपदेशन, जागरूकता अभियान आणि तज्ञांच्या माध्यमातून मुलांना भावनिक आधार देण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे बालकांचे सुरक्षित, निरोगी आणि आनंदी बालपण घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे बालकांच्या मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ‘समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असेही डॉ. पुराणिक यांनी नमूद केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
