पुणे | रयत समाचार
(Crime) महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैनमुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, पिंपरी- चिंचवड येथील संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
(Crime) जैन मुनी पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन महाराणी होत्या, असे विधान केल्याचे समोर आले आहे. या वक्तव्यामुळे ऐतिहासिक सत्याशी छेडछाड होत असून समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केला.
(Crime) काळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यांच्या वंशावळीबाबत कोणताही संभ्रम नसून त्या जैनधर्मीय असल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत.
“इतिहासातील पराक्रमी व्यक्तींबाबत चुकीची माहिती पसरवणे हा प्रकार सहन केला जाणार नाही. महाराणी ताराराणी या पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेल्या योद्धा होत्या. त्यांच्या कार्याचे विकृतीकरण करणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे,” असे काळे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जैन धर्म हा सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारा धर्म असल्याचे सांगत, अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधले.
दरम्यान, संबंधित जैन मुनी नयन पद्मसागर यांनी वक्तव्य तत्काळ मागे घेऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

