नगर तालुका| १३.३ | रयत समाचार
(Cultural Politics) सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी हिवरेबाजार येथे केले. हिवरेबाजार भेटीदरम्यान ग्रामस्थांतर्फे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन व फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला.
(Cultural Politics) यावेळी बोलताना निंभोरकर म्हणाले, भारताच्या नकाशावर कोरलेले आदर्शगाव हिवरेबाजार येथे भेट देण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि सन्मानाचा क्षण आहे. एकेकाळी ओसाड, दुष्काळग्रस्त आणि गरिबीने ग्रासलेल्या या गावाचे आज देशातील सर्वोत्तम आदर्श गावांपैकी एका गावात झालेले रुपांतर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे. ही उल्लेखनीय आणि अतुलनीय कामगिरी पद्मश्री पोपटराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि निस्वार्थ सेवेमुळे शक्य झाली आहे.
(Cultural Politics) राष्ट्रीय सैन्यदल एकजुटीने शत्रूवर हल्ला करते तेव्हाच यश मिळते. त्याचप्रमाणे हिवरेबाजारनेही एकजुटीने राहून गावाचा विकास साधला आहे. सभागृहात निवडून जाणे सोपे असते; मात्र हिवरेबाजारसारख्या गावात सातत्याने ग्रामविकासाची कामे सुरू ठेवणे अत्यंत कठीण असते, असेही त्यांनी नमूद केले. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होणारी कुटुंबे आपण पाहत आहोत, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
पद्मश्री पोपट पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले, निंभोरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा वापर करून देशासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कारगिल युद्धातील ऑपरेशन विजयदरम्यान त्यांनी शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलून गंभीर जखमी अवस्थेतही असीम धैर्याने आपल्या तुकडीचे नेतृत्व केले. रणांगणावरील त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास भारतीय सैन्यदलाचा कळस आहे.
दहशतवादविरोधी अभियानात २२ दहशतवाद्यांचा निःपात, तसेच २०१६ मधील ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रूच्या घरात घुसून एकही भारतीय सैनिक न गमावता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारी रणनीती जगातील लष्करी इतिहासात मास्टर क्लास ठरली, असेही पवार यांनी नमूद केले.
या हिवरेबाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, व्हाइस चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, चंद्रकांत शिंदे, एस.टी. पादीर, राजेंद्र हरिभाऊ ठाणगे, राजेंद्र सहादू ठाणगे, मंगेश ठाणगे, जयहिंद संघटनेचे नीलकंठ उल्हारे, मारुती ताकपेरे, अशोक मुठे आदींसह माजी सैनिक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


