श्रीगोंदा | ७.३ | रयत समाचार
(Literature) तालुक्यातील कोथुळ गावचे सुपुत्र आणि युवा लेखक युनूस सय्यद यांच्या ‘इनुची गोष्ट’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४’ (लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार) जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण लेखक ठरले असून ही बाब केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानाची ठरली आहे.
(Literature) नाशिक येथे आयोजित विश्व मराठी संमेलन सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, शेषराव मोरे, भालचंद्र नेमाडे, मधु मंगेश कर्णिक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
(Literature) अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या युनूस सय्यद यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, अनुभव आणि भावविश्व शब्दबद्ध करत ‘इनुची गोष्ट’ या पुस्तकातून एक हृदयस्पर्शी जीवनप्रवास मांडला आहे. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली ही कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी ठरत आहे. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मातीचा, संघर्षाचा आणि स्वप्नांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल युनूस सय्यद यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


