Biodiversity | ‘माझी वसुंधरा’ नव्या बोधचिन्हाचे अनावरण; पर्यावरण चळवळीला नवी ऊर्जा; स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार नवसंजीवनी

1 Min Read
SubEditor

मुंबई | १२.२ | रयत समाचार

(Biodiversity) राज्यात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Biodiversity) नवीन बोधचिन्हामध्ये पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला असून, अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी हे प्रतीक प्रेरणादायी ठरणार आहे.

(Biodiversity) मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले, पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. नवीन बोधचिन्हामुळे अभियानाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करताना, स्वच्छता, हरित विकास आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश प्रत्येक गावागावात पोहोचवण्याची ही चळवळ आहे, असे नमूद केले.

तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभियानामुळे महिलांचा आणि युवकांचा सहभाग वाढत असल्याचे सांगत, नव्या उत्साहाने प्रत्येक स्थानिक संस्था या अभियानात योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.

नवीन बोधचिन्हाच्या अनावरणामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अभियान नव्याने आणि अधिक जोमाने राबविण्याची प्रेरणा मिळणार असून, महाराष्ट्राची पर्यावरण चळवळ अधिक मजबूत होणार आहे.

 

Share This Article