अहमदनगर | ३१.१ | रयत समाचार
(Agriculture) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व गतिमान करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजने’ला गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २६८ शेत व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाणार आहे.
(Agriculture) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत सदर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, जास्तीत जास्त कंत्राटदार व यंत्रसामग्री मालकांनी निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
(Agriculture) महसूल विभागामार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा मुख्य उद्देश शेत रस्ते व पाणंद रस्त्यांचे बळकटीकरण करून शेतकऱ्यांना दळणवळणाची सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. ही कामे पूर्णतः यंत्रसामग्रीच्या सहाय्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सुलभ कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच दहा विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने २२ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ पर्यंत बंद, अतिक्रमित व महसुली कायद्याप्रमाणे मोकळे करण्यात आलेल्या रस्त्यांची संख्या २,२६८ इतकी आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत शेत रस्ते अथवा पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण आहे, त्यांनी ते तात्काळ हटविण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, अतिक्रमणमुक्त व सीमांकन पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव तालुकास्तरावर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन
India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक