समाजसंवाद | ९ जून | भैरवनाथ वाकळे
(Social) पद्मशाली ही एक पारंपरिक विणकर कष्टकरी समाजातील महत्वाची जात आहे, जी प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत आढळते. ‘पद्मशाली’ या शब्दाचा अर्थ ‘कमळ विणणारा’ असा होऊ शकतो. प्राचीन काळापासून या जातीची मुख्य ओळख ही वस्त्र विणण्याच्या पारंपरिक व्यवसायाशी संबंधित आहे. काळानूरूप बदल होत आजही अनेक महिला वीडी उद्योगामधे कार्यरत आहेत.
(Social) पद्मशाली जातीने पुराणे आणि संस्कृतीची सांगड घालणारी एक विलक्षण जीवनशैली अंगीकारली. विशेषतः पद्मशाली जातीची धार्मिक ओळख ही त्याच्या ‘स्वतंत्र पुरोहित’ परंपरेमुळे उठून दिसते. इतर अनेक धार्मिक प्रगतीशील जाती जमातींप्रमाणे बाह्यब्राह्मणांना न बोलावता, पद्मशाली जातीने आपले स्वतःचे वैदिक शिक्षण घेतलेले पुरोहित घडवले आहेत. हे पुरोहित विवाह, उपनयन, श्राद्ध, वास्तुशांत आदी विधी पार पाडतात. यामुळे समाजाने बाह्यब्राह्मणाधीनता टाळून ‘आत्मनिर्भर धार्मिक परंपरा’ जपली होती. ही गोष्ट समाजाच्या गौरवशाली वैचारिक इतिहासाचा वारसा आहे आणि तो आजही जपला जातो.
(Social) पद्मशाली जातीला आरक्षण मिळाल्याचा फायदा झाल्याने अनेक सकारात्मक बदल झालेले दिसतात. मात्र, वाढती स्पर्धा, सीमित टक्केवारी, व माहितीचा अभाव यामुळे अजूनही जातीतील बहुतांश कुटुंबांना पुरेशी संधी मिळत नाही. काही ढोंगी लोकल राजकीय माणसे ‘पद्मशाली जातीला आरक्षण नाही’, अशा खोट्या फेका मारतात. आधीच कमी माहितीचा अभाव असलेल्या लोकांना खोटी माहिती देवून राजकीय कारणांसाठी दिशाभूल केली जाते. यापासून पद्मशालीच नव्हे तर सर्व जाती बांधवांनी सावध असावे.
अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात पद्मशाली जातीचे मोठे सामाजिक, राजकीय सक्रिय अस्तित्व आहे. विशेषतः शेवगाव, नेवासा, पाथर्डी, नगर शहर, संगमनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव या तालुक्यांमध्ये पद्मशाली जातबांधव मोठ्या संख्येने आढळतात. सुरुवातीस हातमाग उद्योगासाठी दक्षिण भारतातून स्थलांतरित झालेली कुटुंबे येथील गावांत स्थायिक झाली. स्थानिक संस्कृतीत, शेतीमातीत रममाण झाल्याचे आपण पहातो.
आज पद्मशाली बांधव बँका, शिक्षण, कला, उद्योग, सेवाक्षेत्र, राजकारण व बांधकाम उद्योगामधे सक्रिय आहे. जिल्ह्यात विविध मंडळे, सांस्कृतिक व महिला संस्था, वसतिगृहे आणि धार्मिक सभागृहे कार्यरत आहेत. दरवर्षी समाजाच्या संत परंपरेचा प्रचार, गुरुपूजन, बागुल पंडगू, ज्ञानयज्ञ, तसेच सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
पद्मशाली जातीच्या आरक्षण लाभाचा इतिहास थोडक्यात असा.
१९९० नंतर मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये ‘विशेष मागासवर्ग’ (Special Backward Class – SBC) तयार केला. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण अनुसूचित जाती/जमातीच्या यादीत नसलेल्या जातींचा समावेश करण्यात आला. पद्मशाली जातीचा समावेश SBC प्रवर्गात करून २% आरक्षण दिले. याचा उपयोग शिक्षण, सरकारी नोकऱ्या, निवडणुकीतील आरक्षित जागा आणि इतर सरकारी योजनांमध्ये होतो. हा निर्णय एक ऐतिहासिक टप्पा ठरला.
अहमदनगरमधील पद्मशाली तरुणांनी शिक्षण घेतले असले तरी, रोजगार व उद्योजकतेच्या संधी अजूनही मर्यादित आहेत. त्यामुळे जातीच्या अनेक संघटना राज्य शासनाकडे आरक्षणात वाढ, विशेष शैक्षणिक योजना व प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची मागणी करत आहेत.
पद्मशाली बांधव शिक्षण, कौशल्य, उद्योग व सामुदायिक संघटन यांवर भर देत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तरुण स्टार्टअप्स, स्पर्धा परीक्षा, डिजिटल शिक्षण व सामाजिक कार्यात पुढे येत आहेत. महिलाही स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून सशक्त होत आहेत. एकीकडे आरक्षणाच्या वाढीव अधिकारांसाठी प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे आपल्या धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेच्या जोरावर स्वबळावर उभा राहत आहे. स्वतंत्र पुरोहित परंपरा, स्वतःचे मंगल कार्यालय, शिक्षण संस्था, पतसंस्था, धर्मशाळा-संस्था, आणि सामाजिक बांधिलकी ही या कष्टकरी वाटचालीची ओळख आहे.
पद्मशाली जातीचा इतिहास समृद्ध असूनही, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक अडथळ्यांचा सामना केला. SBC आरक्षणामुळे काही प्रमाणात संधी मिळाली असली, तरी संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी अजूनही शासनाच्या धोरणात्मक पाठबळाची गरज आहे. अहमदनगरसारख्या जिल्ह्यात पद्मशाली जातीने स्वतःचे वेगळेपण टिकवून ठेवत, आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवला आहे. भविष्यात पद्मशाली हे नाव फक्त विणकामापुरते मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे, फक्त फेका मारणारांपासून सावध असायला हवे.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.