🏠 📰 📍 🔍 ☎️

Religion | वारकरी धर्मातील ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ उपक्रमाबाबत अफवांचा प्रसार; विकृतांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

3 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्य की जय हो

    पंढरपूर | ४ जुलै | प्रतिनिधी

    (Religion) भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्या १२ वर्षांपासून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ७ वर्षांपासून ‘संविधान समता दिंडी’ हे उपक्रम महाराष्ट्रात यशस्वीरित्या राबवले जात आहेत. संविधानातील समतेचा विचार आणि संतांच्या समतावादी विचारसरणीचा संगम साधणाऱ्या या उपक्रमांना अलीकडे काही समाजविघातक प्रवृत्तींकडून अफवा पसरवून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे आयोजकांनी या प्रवृत्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    (Religion) भारतीय संविधानात संत, समाजसुधारक यांच्या विचारांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर’, हा समतेचा विचारच संविधानाचा आत्मा आहे. वारकरी परंपरेचा हा मूल्याधारित वारसा जपत ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ हे उपक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांना वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांचे पाठबळ आहे.

     

    (Religion) ‘एक दिवस तरी वारी’ : मंगळवार, २४ जून २०२५ रोजी यवत ते वरवंड मार्गावर. ‘संविधान समता दिंडी’ : शनिवार, २१ जून २०२५ रोजी समताभूमी, पुणे (महात्मा फुले वाडा) येथून प्रस्थान झाले. वरील उपक्रम वारीच्या पारंपरिक पद्धतीत कोणतीही बाधा न आणता शांततेत व यशस्वीपणे पार पडले.

     

    आयोजकांच्या म्हणण्यानुसार, काही विकृत मानसिकतेचे लोक या उपक्रमांना ‘अर्बन नक्षल’ असे खोटे लेबल लावून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजात द्वेष आणि गोंधळ निर्माण करून राजकीय-सांस्कृतिक पोळी भाजण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. संतांच्या समतेच्या विचारांना नाकारून वारी परंपरेला संकुचित, सनातनी चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई यांच्या काळात जसे मंबाजीसारखे विरोधक होते, तसेच आजही काही प्रवृत्ती कार्यरत आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

     

    या उपक्रमांमध्ये नक्षलवादी अथवा वादग्रस्त व्यक्ती किंवा संघटना सहभागी नसल्याचे आयोजकांनी ठामपणे सांगितले आहे. उलट, वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित मान्यवर सतत सहभागी होत आहेत. ह.भ.प. राजाभाऊ चोपदार (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (ज्येष्ठ कीर्तनकार), ह.भ.प. भारत महाराज जाधव (कैकाडी महाराज मठ), ह.भ.प. धम्मकीर्ती महाराज अशी मंडळी सोबत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. अशा अफवा आणि खोट्या प्रचारामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.

     

    या विरोधकांकडून भविष्यात वारीमध्ये कोणते अनिष्ट प्रकार घडवून त्याचा दोष आयोजकांवर ढकलण्याचा डाव आखला जात असल्याचा आयोजकांना संशय आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींकडून समाजात शांतता भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आयोजकांनी मांडली.

     

    प्रमुख आयोजक व सहकार्य करणारे मान्यवर. ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, ह.भ.प. हरिदास महाराज तम्मेवार, ह.भ.प. भारत महाराज घोगरे, ह.भ.प. समाधान महाराज देशमुख, शरद कदम, अविनाश पाटील, ॲड. वर्षा देशपांडे, नागेश जाधव, विशाल विमल, दीपक देवरे, सुमित प्रतिभा संजय, सरस्वती शिंदे, दत्ता पाकिरे, महादेव पाटील, राजाभाऊ अवसक, साधना शिंदे, माया वाकोडे, नरेंद डुंबरे, प्रकाश मानेकर, सुबोधदादा महाराज.

     

    अधिक माहितीसाठी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर 9892673047, 9594999409, विशाल विमल 7276559318 यांना संपर्क करण्याचे आवाहन.

    Share This Article
    Leave a comment

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *