अहमदनगर | २९.१ | रयत समाचार
(Public issue) ता. २८ जानेवारी २०२६ रोजी लोकप्रिय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित आशाबाई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर शोककळा पसरली. राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दु:खवटा जाहीर करण्यात आला असताना, अहिल्यानगर शहरातील वादग्रस्त मनमाड रस्त्यावर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
(Public issue) शहरातील झोपडी कँटिन समोर, रात्री ठीक १२.०५ वाजता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डांबरीकरणाचे काम जोरात सुरू होते. विशेष म्हणजे या संपूर्ण कामकाजादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही जबाबदार अधिकारी कार्यस्थळी उपस्थित नव्हता. केवळ मजूर, यंत्रसामग्री, डंपर व टँकरच्या मदतीने रात्रभर काम चालू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
(Public issue) शासकीय दु:खवट्याच्या काळात सर्व शासकीय कार्यालये बंद असताना आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम, कामकाज स्थगित असताना, मध्यरात्री रस्त्याचे डांबरीकरण सुरू ठेवण्यामागे नेमका कोणाचा आदेश? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, सकाळपर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत डांबरीकरणाचे पट्टे पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आधीच वादग्रस्त ठरलेल्या मनमाड रस्त्यावरील हे काम नियमानुसार आहे का, दर्जाची तपासणी कोणी केली, आणि अधिकारी अनुपस्थित का होते, याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
शोकाकुल वातावरणात सुरू असलेला हा ‘रात्रीचा खेळ’ म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे आणि नियोजनाच्या अभावाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

