Public issue | कचऱ्याच्या विळख्यातून नगरला मुक्त करा- सामाजिक संस्थांची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

अहमदनगर | २४.९ | रयत समाचार

(Public issue) गेल्या काही महिन्यापासून महानगरपालिकेची कचरा संकलन व्यवस्था कोलमडली असून शहरात विविध ठिकाणी कचरा रस्त्याच्या कडेला पडून राहतो आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिनपणे दुष्परिणामांस सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी कचरा समस्येबाबत सविस्तर चर्चा करुन निवेदन देवुन नगरला कचऱ्याच्या विळख्यातुन मुक्त करण्याची मागणी केली.

(Public issue) आयुक्त डांगे यांनी २० दिवसात नवीन कंत्राटसाठीची संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही समस्या सुटेल. सध्या ५० घंटागाड्या दैनंदिनपणे कचरा संकलन करीत असून या गाड्यांमध्ये वाढ होऊन त्यांची संख्या ९० होईल आणि पुन्हा परिस्थिती पूर्ववत होईल. असे सांगून या प्रश्नानावर प्रशासन गंभीर असल्याचे म्हटले.

(Public issue) आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत निवेदनावरील मुद्द्यांवरती तसेच इतर कचऱ्याच्या समस्येबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने घंटागाडीच्या माध्यमातून दैनंदिन होणारे कचरा संकलन पूर्ववत करण्यात यावे. घंटागाड्याची संख्या वाढवुन त्याचे चोख नियोजन करावे. सार्वजनिक जागेवरील तसेच रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग दैनंदिनपणे उचलून घेण्यात यावे. एकल वापराच्या प्लास्टिक वस्तू, कॅरीबॅगवर बंदी असूनही त्याचा वापर शहरात सर्रासपणे सुरु आहे. या वस्तूंचा वापर, विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शहरात आरोग्य विभागामार्फत नियमित औषध फवारण्याची व्यवस्था करावी. मोकाट कुत्रे रस्त्यावर व मोकळ्या जागेत दैनंदिनपणे घाण करत हागत (शौच) करीत असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करुन ते करीत असलेली घाण स्वच्छ करण्याची व्यवस्था करावी. नाले व गटरी यांची दैनंदिनपणे स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करावे. चौकात, उद्यानात तसेच रस्त्याच्या दुतर्फा काही भागात डस्टबिन लावण्याची व्यवस्था करण्यात यावी. आदी मागण्या लावून धरण्यात आल्या.
चर्चेत स्वच्छता रक्षक समितीच्या अध्यक्ष प्रतिमा धूत, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, राजेश परदेशी, दादासाहेब करंजुले, डॉ. सुधा कांकरिया, शुभा खंडेलवाल, प्रशांत दरेकर, संदीप कुसाळकर, संजय जोशी, संदीप ठोंबे, शुभा खंडेलवाल, ज्योती दीपक, नेहा जाजू , प्रभा खंडेलवाल, पल्लवी जोशी आदींनी सहभाग घेतला.
यावेळी स्वच्छता रक्षक समिती, हरियाली संस्था, अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशन, नैतीक फाउंडेशन, निरंजन सेवाभावी संस्था युवान, ब्ल्यु जेम फाउंडेशन, इंडियन डेंटलअसोसिएशन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी, महेश्वरी युवा संघ, माझी बाग, सावली दिव्यांग संस्था, विकास प्रबोधिनी आदी सामाजिक संस्थांच्या वतीने ७०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडेही पाठविण्यात आली.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading