Literature | मराठी साहित्यासाठी साहित्यिक मंच करत असलेले कार्य उल्लेखनीय- प्रशांत मोरे; चौथे राष्ट्रीय कविसंमेलन दिमाखात

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

वलसाड, गुजरात | २७.३ | रयत समाचार

(Literature) मराठी साहित्याच्या प्रसारासाठी भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून, भविष्यातही अशीच साहित्यसेवा सुरू राहावी, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष प्रशांत मोरे यांनी व्यक्त केली. भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित चौथे राष्ट्रीय कविसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुजरातमधील वलसाड येथे उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. रविवारी ता. २२ मार्च २०२६ रोजी समुद्रकिनारी, स्वामीनारायण मंदिराच्या सान्निध्यातील नयनरम्य अक्षरमहोल सभागृहात हा साहित्यसोहळा रंगला.

(Literature) मंचाच्या संस्थापिका भाग्यश्री बागड, संयोजक राकेश बागड आणि आयोजक प्रदीप बडदे यांच्या पुढाकाराने गुजरातसारख्या राज्यात मराठी साहित्याचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित झाला. नवोदित कवी कवयित्रींना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

(Literature) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व लोककवी प्रशांत मोरे होते, तर उद्घाटक म्हणून शरद चितोडकर आणि स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. चंद्रकांत कोठावदे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नितीन वायाळ, संदीप राक्षे, संजय आहेर, माणिकराव गोडसे आणि प्रकाश फर्डे यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काव्यलेखन आणि गीतलेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कवयित्री उज्ज्वला कोल्हे यांच्या ‘आठवणींच्या शब्दकळा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.
संमेलनात गझल, पोवाडा, बालगीत, भावगीत, वृत्तबद्ध, छंदोबद्ध आणि मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या कवितांचे सादरीकरण झाले. चौघडावादक रमेश पाचंगे, तुतारीवादक भरत पाचंगे आणि शंखवादक गजानन जावरकर यांनी सादर केलेल्या वादनाने वातावरण भारावून गेले.
पहिल्या सत्रात अनुकूल माळी यांनी आपल्या शैलीतून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच गोविंद पारकर, कल्पना देशमुख, आनंद ढाले, ज्योती राखुंडे, प्रमोद सूर्यवंशी आणि गोरख पालवे यांच्या रचना विशेष ठरल्या. दुसऱ्या सत्रात राहुल भोवते, हरिश्चंद्र दळवी, दक्षा संखे, वीर देसाई, मीना ठाकोर, संतोष चिले, महेश अडगुलवार, मनोहर पवार, मंजु राजेजाधव, नवीनकुमार कारेमोरे, यशवंत पगारे, संदेश वाघमारे, साईनाथ रहाटकर, विजय पिलकर, अर्जुन बांबेरे, संजय हिवाळे यांच्यासह सुमारे ४० कवी-कवयित्रींनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल येवला आणि बाळासाहेब गिरी यांनी प्रभावीपणे केले. सर्व सहभागी कवी-कवयित्रींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading