(India news) अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्वराज्य महाराणी येसुबाई, छत्रपती संभाजी महाराजपुत्र छत्रपती शाहू हे, तर ‘आरक्षणाचे जनक’ राजर्षी शाहू महाराज यांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे ब्रिटीशांनी कैदेत ठेवले होते. याच ठिकाणी चौथे शिवाजी महाराजांची हत्या झालेली आहे. शिवरायांच्या वंशजांचा अहमदनगरच्या भूमीस पदस्पर्श झालेला आहे. नव्या पिढीला त्याचा विसर पडू नये. शिवरायांचा क्रांतिकारी इतिहास जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या वंशजांचेही महाराष्ट्रासह देश घडविण्यात मोठे योगदान आहे तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा फोर मोठा वाटा आहे. या वास्तूंचासुध्दा विकासकामात समावेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी केली.
(India news) ता. ७ रोजी जिल्हा पर्यटन विकास आराखड्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्यापक बैठक झाली. या बैठकीत इतिहासप्रेमी मंडळाने ऐतिहासिक पर्यटनासंदर्भात भुमिका मांडून सुचना दिल्या. या सुचनांची पर्यटन आराखड्यात दखल घेतली जाईल, अशी माहिती इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी दिली.
(India news) पुढे माहिती देताना असिफखान म्हणाले, शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा पुसू न देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून पर्यटक अहमदनगरला येतील. शिवरायांच्या वंशजांचा इतिहास जाज्वल्य आहे. आपण अहमदनगरकरांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा विचार करून विकासात्मक कामात या गोष्टींचा समावेश करावा, ही आग्रही मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने केली. यावेळी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.