History | समतेचा संदेश देणारा ‘सत्यशोधक विवाह’ संपन्न; क्रांतीगीतांच्या साक्षीने, महापुरुषांना अभिवादन

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

यवतमाळ | ४.४ | रयत समाचार

(History) येथील बाळकृष्ण मंगलम येथे ता. ३० मार्च रोजी कु. ईश्वरी शारदा निळकंठराव काळे (पुणे) आणि चि. पलाश छाया राजेंद्र गुघाणे (यवतमाळ) यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते.

(History) क्रांतीगीत “तू यावं तू यावं, बंधन तोडीत यावं” यांच्या लयीत वधूवरांचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर सम्राट बळीराजा, जिजाऊ माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

(History) विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थितांना पुष्पवृष्टीसाठी फुलांच्या पाकळ्या वाटण्यात आल्या. सत्यशोधक प्रबोधन महासभेचे किशोर ढमाले यांनी या विवाह पद्धतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडत महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत साध्या, समतेवर आधारित विवाहाची गरज त्यांनी स्पष्ट केली.
सत्यशोधक साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक चोपडे यांनी २५ डिसेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी लावून दिलेल्या पहिल्या सत्यशोधक विवाहाचा उल्लेख करत या चळवळीचा संघर्षमय इतिहास उलगडला.
History
“सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर” या अखंडाने विधीची सुरुवात झाली. आईवडिलांना वंदन करत वधूवरांनी परस्परांना अंगठी घालून समतेची आणि सहजीवनाची प्रतिज्ञा घेतली.
विवाहातील विशेष आकर्षण म्हणजे वधूवरांनी घेतलेली सत्यशोधक शपथ. परस्परांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर, समतेने वागणे आणि सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्धार.
आपट्याच्या जोडपानाच्या माध्यमातून सहजीवनातील एकात्मतेचे प्रतीक दर्शवण्यात आले. “स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने” या अखंडाने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात वधूवरांवर पुष्पवृष्टी करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
या विवाह विधीचे संचालन बाबा बिडकर यांनी केले, तर अखंड गायन अनुज हुलके यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी वधूवरांची भावंडे डॉ. प्रणिता काळे आणि मंथन गुघाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी माजी आमदार ख्वाजा बेग यांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
समतेचा, साधेपणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा सत्यशोधक विवाह यवतमाळमध्ये विशेष ठरला.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article