अहमदनगर | २७ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Ahmednagar News जिल्ह्यातील पशूंची गणना करण्याची मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून या मोहिमेत जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
जिल्ह्यात करण्यात या गणनेत गायवर्ग, म्हसवर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला मारलेल्या (टॅगींग केलेल्या) जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची गणनाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, ८६ चौरस किमी महानगरपालिका हद्दीत मनपाच्या घनकचरा, संकलन विभागाच्या दूर्लक्षामुळे निर्माण झालेल्या असंख्य मोकाट डुकरांची शिरगणती ५६ प्रगणक कशी करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रभागात मोठमोठाले कचऱ्याचे ढिग असून कचरा संकलनाचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे असंख्य मोकाट डुकरे निर्माण झालेली आहे. शहरात मोकाट डुक्कर असणे हे ‘अस्वच्छ शहर’ असल्याचे चिन्ह आहे.
पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते, शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पशुधनानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. तसेच याचा फायदा त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना राबवितांना होणार असल्याने आपल्याकडील जनावरांची माहिती द्यावी, असे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी कळविले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
