Tribute: स्व.फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांचे विचार प्रेरणादायी – डॉ.सुरेश पठारे; सीएसआरडीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो अभिवादन सभा संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी

येथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेमधे ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मराठी भाषेतील ख्यातनाम साहित्यिक, पर्यावरण चळवळीचे प्रणेते स्व.फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या tribute अभिवादन सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सभेस अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक, साहित्यिक आणि पुरोगामी विचारांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वर्गीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील विविध पैलू आणि कार्याचा उजाळा देत त्याच्या विचारमंथन करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रास्ताविक साहित्यिक ज्ञानदेव गायकवाड यांनी केले. त्यांनी फा.दिब्रिटो यांच्या कार्याची महती सांगून त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली तसेच ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सुधाकर शेलार, कवी सुभाष सोनवणे, म.सा.प.चे जयंत येलुलकर, अशोक सब्बन आदी मान्यवरांनी भाषणे झाली.

ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी दिब्रिटो हे अहमदनगरला एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी घेतलेल्या मुलाखतीचा अनुभव सांगितला. फादर दिब्रिटो यांच्या साधेपणाचे, विनम्रतेचे आणि प्रेमळ स्वभावाचे विशेष गुण उजागर केले. होलम यांनी फादर दिब्रिटो यांच्या विचारांनी मनात खोलवर घर केले असे सांगत त्यांचे आदरपूर्वक स्मरण केले. जयंत येलुलकर यांनी मराठी साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. कवी सुभाष सोनवणे यांनी त्याच्या सोबत झालेल्या भेटीचे संदर्भ देत दिब्रिटो यांचा निर्मळ स्वभाव व कार्याची माहिती दिली.
डॉ.सुधाकर शेलार यांनी आपल्या भाषणातून फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साहित्याबाबत विचारमंथन करण्याची आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणही त्यांचे कार्य पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्यातील साधेपणा आणि मानवी मूल्यांबद्दल असलेला कळवळा अंगीकारण्याजोगा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या साहित्याचे व भाषणाचे विविध संदर्भ देत सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका विषद केली. फादर दिब्रिटो यांनी शांतता, बंधुभाव, एकात्मता यासाठी काम करताना पर्यावरण प्रेमाची हरित वसई चळवळ उभी केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास आणि त्यातून एकोपा साधण्याचा त्यांचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

सभेच्या अध्यक्षीय भाषणात सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी त्यांच्या सहवासातून आलेल्या अनेक आठवणी विशद केल्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विचारांची किती महत्वपूर्ण भूमिका आहे, याची मांडणी केली. दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि कार्य याबद्दल सखोल विचार मांडत, फादर दिब्रिटो यांच्या सहवासाचा लाभ हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. पठारे यांनी प्रत्येकाने विषमतेची तसेच अन्यायाची वाट सोडून विवेकाचा जागर करण्याची आवश्यकता स्पष्ट केली, आणि फा. दिब्रिटो यांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ धर्म, जात या गोष्टीवरून व्यक्तीचे मूल्यमापन न करता त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख पाहायला हवा. दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. म्हणूनच त्यांना साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र शासनानेही साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यामुळे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी साहित्यविषयक चळवळीत पर्यावरणप्रेमी भूमिका घेऊन केलेले लेखन हे त्यांचे आगळेपण आहे. ‘सुवार्ता’ या त्यांच्या नियतकालिकाने मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या साहित्यिक योगदानाची आणि पर्यावरण चळवळीत निर्माण झालेल्या हरित वसई चळवळीची मोलाची आठवण प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या चळवळीने फक्त मराठी साहित्यालाच नव्हे, तर समाजाच्या विविध अंगांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजात विवेक जागर करावा, असे आवाहन त्यांनी केले. फादर दिब्रिटो यांच्या लेखनाने आणि पर्यावरण प्रेमाने मराठी साहित्याला नवा आयाम दिला असून, त्यांनी संत साहित्याच्या माध्यमातून समाजात एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असेही पठारे यांनी नमूद केले. त्यांच्या निधनामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला असल्याचे मत यावेळी पठारे यांनी व्यक्त केले.

अभिवादन सभेचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले तर सीएसआरडी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सभा आयोजनासाठी परिश्रम घेतले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading