प्रासंगिक | तुषार सोनवणे
बीसीसीआयने १३ मे रोजी मावळते प्रशिक्षक राहुल द्रविडचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी या पदासाठी अर्ज मागवले होते, ज्यांचा कार्यकाळ टी -२० विश्वचषक, २०२४ नंतर संपला आहे. द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल बीसीसीआयच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले त्यांचा कार्यकाळात टीम इंडियाची झालेली कामगिरी सुवर्ण अक्षरांने लिहिण्या योग्य आहे, असे बीसीसीआयच्या वतीने सांगण्यात आले. त्यात पुरुष टी -२०विश्वचषक २०२४, ला चॅम्पियन बनणे सर्वात उल्लेखनीय आहे. टीम इंडियाने भारतात आयोजित ५०-ओव्हर विश्वचषक, २०२३ आणि इंग्लंडमध्ये आयोजित २०२३ मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील उपविजेतेपद पटकावले होते. द्रविड सोबतच पारस म्हांबरे (गोलंदाजी प्रशिक्षक), टी. दिलीप (फिल्डिंग प्रशिक्षक) आणि विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक) यांचे त्यांच्या अत्यंत यशस्वी कामगिरीबद्दल मंडळाने अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुश्री सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी एकमताने गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक (वरिष्ठ पुरुष) म्हणून शिफारस केली. भारताचा माजी फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल जिथे टीम इंडिया २७ जुलै २०२४ पासून ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
बीसीसीआयने टीम इंडियासोबत मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत गौतम गंभीरचे स्वागत केले आहे. माजी भारतीय सलामीवीर गंभीरकडे अनुभवाचा खजिना आणि खेळाची सखोल माहिती आहे. त्याच्या आक्रमक आणि रणनीतिक कौशल्यासाठी तो ओळखला जातो. २००७ विश्व टि-२० आणि २०११ क्रिकेट विश्वचषकामधे त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. गंभीरने त्याच्या आयपीएल फ्रँचायझी, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे २०१२ आणि २०१४ मध्ये दोन विजेतेपद मिळविले आहेत. २०२४ मध्ये KKR सोबत मार्गदर्शक म्हणून गंभीरने संघाला तिसरे आयपीएल विजेतेपद मिळवण्यास मदत केली.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरवर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा विकास करणे, टीममध्ये शिस्त लावणे, तरुण प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना वाव देणे तसेच नवीन आव्हानांसाठी संघाला तयार करणे हे प्रमुख ध्येय असणार आहेत.
जय शाह BCCI चे मानद सचिव म्हणाले “आम्ही श्रीमान राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफ टीमचे त्यांनी भारतीय टीमसोबत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी आभार मानतो. संघाने विविध स्वरूपांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आणि २०२४ च्या पुरुष टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारताला चॅम्पियन बनवले. हा एक क्षण आहे जो देश दीर्घकाळ लक्षात ठेवणार आहे. यापुढे गंभीर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे तो एक उत्कृष्ठ रणनीतीकार आहे असेही ते म्हणाले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.