सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसा व द्वेष पसरवत असतात, असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यावर राहुल गांधी हे संपूर्ण हिंदू समाजाला हिंसाचारी म्हणत असल्याचा आक्षेप सत्ताधाऱ्यांनी घेतला. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, असा पलटवार राहुल यांनी केला.
विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्यांदा बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. भाजपचे लोक २४ तास हिंसाचाराची भाषा बोलत असतात; पण हिंदू कधीही हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. हिंसाचाराच्या आरोपावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागलीच आक्षेप घेत काँग्रेस नेत्याने संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचा आरोप केला, याचे पडसाद आज अहमदनगरमध्ये उमटले.
शहरातील चितळेरोड येथील काँग्रेसच्या बंद कार्यालयाच्या शटरवर भारतीय जनता युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, बंटी डापसे, सचिन पावले, सुजय मोहिते, अजित कोतकर, आदेश गायकवाड, सुरेश लालबागे आदी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध करून बंद कार्यालयाच्या शटरवर निषेधाचा फलक लावला.