पारनेर | 11 जून | प्रतिनिधी
(politics) “सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढणाऱ्या महायुती सरकारला जागं करण्यासाठी सरसकट कर्जमाफी न मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशी ठाम भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अॅड कॉ. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. पारनेर येथे पार पडलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५ व्या त्रैवार्षिक तालुका परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कॉ. लांडे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता सत्तेत आल्यावर तेच आश्वासन पाळण्यात आलेले नाही. त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेऊन मोर्चा काढून हे अर्ज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार आहे.
(politics) परिषदेच्या पुढील सत्रात राजकीय, संघटनात्मक आणि आंदोलनात्मक अहवालावर चर्चा करण्यात आली. शेतकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र सरकारचे जनविरोधी जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घ्यावे, शेतमालाला हमीभावासाठी (एमएसपी) कायदा लागू करावा, तसेच केंद्र सरकारने आणलेल्या चारही श्रम संहितांचा विरोध करण्यात आला.
या आंदोलनांची तीव्र तयारी करत, येत्या ता. ९ जुलै २०२५ रोजी होणारा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा ठरावही परिषदेने संमत केला.
पक्षाच्या नव्याने निवडलेल्या ३५ सदस्यीय तालुका कौन्सिलमध्ये कॉ. संतोष खोडदे यांची पुन्हा तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. कॉ. कैलास शेळके आणि कॉ. बबनराव रावडे यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
(politics) या परिषदेस जिल्हा सहसचिव सुधीर टोकेकर, शिवाजी करंजुले, जयसिंग गायकवाड, बापू घुमटकर, अंकुश गायकवाड, चंद्रकांत चौधरी, हौशीराम पाटील, किरण खामकर, सुदाम गायकवाड, सुलाबाई आदमाने, रखमाबाई शेळके, मैनावती दिवेकर, निर्मला खोडदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत किसान सभेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी सुभाष ठुबे, सचिवपदी संपतराव रावडे आणि उपाध्यक्षपदी बापू गायकवाड यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबनराव सालके-पाटील होते.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता