आणखी एका प्रतिष्ठित सहकारी बँकेत अशाच प्रकारे अनियमित कर्ज वितरण
अहमदनगर | २२ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(India news) नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल १०५ आरोपी निष्पन्न झाले. यात आतापर्यंत सुमारे १५ ते २० आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अर्बन बँकेच्या पिडित ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकरणाच्या सखोल कारवाईबाबत आदेश दिले. तरीही आरोपी मोकाट आहेत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेत कारवाई सुरू केली. दुर्दैवाने नगरमधील या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तितके गांभीर्य फडणवीस यांच्या गृहखात्याकडुन दिसत नाही, अशी खंत बॅंकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केली.
(India news) राजेंद्र चोपडा यांनी म्हटले की, नगर अर्बन बँकेत तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व इतर संचालक मंडळाने तब्बल २९१ कोटी रुपयांचा घोटाळा केला. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्येच ही बाब निष्पन्न होऊ सुमारे १०५ आरोपींची नावे निश्चित करण्यात आली. परंतु या प्रकरणात कारवाई ‘कासव गतीने’ ‘चालू’ आहे. फक्त १५ ते २० आरोपींना अद्याप अटक झाली आहे. उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहेत. आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. बॅंकेची कर्ज थकबाकी वसुलीसुद्धा ठप्प आहे. परिणामी हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत. त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन अतिशय धिम्या गतीने कारवाई करत असल्याने या प्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाई कधी होणार आणि सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
