नवी दिल्ली | ८.३ | रयत समाचार
(India news) भारतीय लोकशाहीत सत्ता जनमतावर उभी असते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर होणारी टीका ही शत्रुत्व नसून आत्मपरीक्षणाची संधी असते. मात्र, सध्या घडत असलेल्या काही घटनांमुळे या मूलभूत लोकशाही तत्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरील प्रभावी आवाज म्हणून ओळखला जाणारा लेखक आणि इन्फ्लुएन्सर अजित भारती याला दिल्लीत अटक झाल्याची घटना याच पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
(India news) अजित भारती हा हिंदी गायपट्ट्यात आणि सोशल मीडियावर कट्टर उजव्या विचारसरणीचा आवाज म्हणून ओळखला जातो. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये न उमटणारे विचार त्याने डिजिटल माध्यमावरून सातत्याने मांडले. ‘OpIndia’ सारख्या माध्यमांशी संबंधित राहून तसेच स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून त्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अनेक धोरणांचे जोरदार समर्थन केले होते.
(India news) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्याने अनेकदा अत्यंत कठोर टीका केली. त्यामुळे भाजप समर्थकांमध्ये त्याची प्रतिमा सरकारच्या बाजूने ठाम भूमिका घेणाऱ्या डिजिटल आवाजाची झाली होती.
मात्र, गेल्या काही काळात परिस्थिती बदलताना दिसत आहे. विशेषतः ‘UGC Equity Regulations 2026’ या नियमांबाबत अजित भारती याने रा.स्व. संघाच्या मोदी सरकारवर तीव्र टीका सुरू केली. या नियमांच्या काही तरतुदी अस्पष्ट असल्याचा आरोप करत त्याने उच्चशिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण होत असल्याचे म्हटले. त्याच्या मते या धोरणांमुळे उच्चवर्णीय विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो.
या मुद्द्यावरून त्याने सोशल मीडियावर सातत्याने सरकारला प्रश्न विचारले. त्याच्या टीकेला काही विद्यार्थी गटांकडून पाठिंबाही मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, ८ मार्च रोजी दिल्लीत या नियमांविरोधात आंदोलन करण्यात येत असताना अजित भारती यास अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि सरकारची टीका सहन करण्याची क्षमता यावर नवी चर्चा सुरू झाली.
लोकशाही व्यवस्थेत शांततामय निदर्शने करणे हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार मानला जातो. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई योग्य की अयोग्य, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विशेष म्हणजे, सरकारच्या धोरणांचे समर्थन करणारे अनेक डिजिटल क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स गेल्या काही वर्षांत सार्वजनिक चर्चेत महत्त्वाचे ठरले आहेत. त्यास भारतात गोदी मिडीया आणि अंधभक्त असेही नाव आहे. अशा परिस्थितीत त्याच गटातील एका प्रभावी व्यक्तीवर झालेली कारवाई ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जेव्हा एखादा समर्थकच सरकारवर टीका करू लागतो, तेव्हा त्या टीकेकडे लक्ष देणे अधिक आवश्यक असते. संवाद आणि स्पष्टीकरणाचा मार्ग स्वीकारणे हा लोकशाहीसाठी अधिक सकारात्मक पर्याय ठरू शकतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशामागे देशातील तरुण मतदारांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेले तरुण मतदार अनेकदा अशा मुद्द्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यामुळे अजित भारती प्रकरणामुळे निर्माण झालेली चर्चा भविष्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या समर्थकांनाही तितक्याच स्वातंत्र्याने मत मांडण्याची संधी असावी का?
लोकशाहीची खरी ताकद विरोधकांच्या संख्येत नसून टीका सहन करण्याच्या क्षमतेत असते. त्यामुळे या घटनेतून सरकारने कोणता संदेश दिला जातो आणि पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


